Sunday 31 December 2017

नवं वर्ष,नवी दृष्टी

नवं वर्ष,नवी दृष्टी

नवीन वर्ष आणि सोमवार हे समीकरण एकदा जुळून आलं की मग आपला आनंद गगनात मावेनासा होतो.  कोणतंही नवीन चांगलं काम करायला मी  एक तारीख, सोमवार किंवा गुरुवार निवडतो. आणि समजा जर कॉम्बिनेशन आलंच तर मग काय दुधात साखरच.

आता आज मला नव्या उमेदीने काहीतरी सुरुवात करायचीय, कारण उद्या सोमवार पण आहे आणि एक जानेवारी पण. असं कॉम्बिनेशन दरवर्षी थोडंच येतं.

ह्या सोमवारी म्हणजे एक जानेवारीला दोन हजार अठरा या वर्षाचं स्वागत करताना एवढं नवं कोरं वर्ष त्या विधात्याने आपल्या झोळीत टाकल्या बद्दल सर्वप्रथम त्याचे आभार मानले पाहिजेत, नाही का?

   कारण त्याने अजून पर्यंत तरी श्वास दिलाय म्हणूनच मी हे करू शकतोय.

आज माझ्या मनात घर करून राहिलेल्या सगळ्या प्रेरणाहीन, नकारात्मक व भीतीदायक अशा सैतानाला मारून काहीतरी नवं करायचं आहे, मानसिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.  माझ्यावरची जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडण्यास मला सज्ज व्हायचंय.

एकविसाव्या शतकातील या अठराव्या वर्षात पदार्पण करताना मी माझ्यात नक्कीच बदल घडवतोय, तयार होतोय येणारं आयुष्य झेलायला,अधिक मजबूत व ताकदवान होउन... स्वप्नं साकारायला, स्वप्नं बघायला आणि सदैव फ्रेश रहायला.

तुम्हाला सर्वाना नववर्षाच्या शुभेच्छा...
हॅपी न्यू इयर...
© प्रमोद जोशी

प्रिय २०१७

प्रिय २०१७,


सस्नेह नमस्कार,

       गेल्या एक जानेवारीला तू आलास. २०१६ ची नाळ जोडूनच आलास... त्याचीही काही अर्धवट कामं सोबत घेऊन अगदी फाईली बरोबर घेऊनच. 

      तू वेगाने मार्गक्रमण करीत राहिलास. आज अखेरचा दिवस - ३१ डिसेंम्बर. प्रत्येक वर्षाला अखेर असते आणि दिवसाला एक रात्र. दिवस, संध्याकाळ, रात्र मध्यरात्र असा धावत धावत तू इथपर्यंत पोहोचलास. आज तू साथ सोडून जाणार हे खरंच क्लेश दायक वाटतंय. 

       एखाद्याच सोडून जाणं हे किती वेदना देणारं, क्लेश देणारं, मनाचा कोलाज बिघडवून टाकणारं  असतं हे किती जणांनी  तुझ्या साक्षीनच अनुभवलं  आहे. त्यांच्या  सर्व आप्त स्वकीयांप्रमाणच तू सुद्धा त्यांच्या  वेदनांवर फुंकर घातली आहेस. खरं सांगू  या कालचक्राच्या रहाटगाडग्या मधून , चरितार्थाच्या गतीत, सतत काही ना करण्याच्या उर्मीत आज ३१ डिसेंबर कधी आला ते कळलच नाही.

अन आता एकदम मन अंतर्मुख झालंय, एकदम रिकामं रिकामं वाटतंय. 

माझ्यातली तीव्र संवेदन क्षमता आणि प्रकाश झोत अंधुक झाल्यासारखं वाटू लागलंय. कुणीतरी जाणार हेच मन आताशा मानत नाहीये. 
अरे आपला बाप्पा पुढच्या वर्षी येण्याचं वचन देऊन जातो तरी आमचे डोळे पाणावतात, अगदी ५ दिवस आमच्या सोबत असला तरी.
मग मला सांग गेले वर्षभर ३६५ दिवस तू साथ दिली आहेस आणि आता जाण्याचा दिवस आलाय... तो ही परत कधीच न येण्यासाठी! 

खरच अगदी भरून आलंय, हे असं का व्हावं...

हे वर्ष, ह्या वर्षातल्या बऱ्या वाईट घटना, दुःख व मानापमानाचे प्रसंग, कटू शब्द, आजवर जगलेले सर्व आयुष्य....या सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आली म्हणून असेल कदाचित! गत वर्षाचं, कटू व गोड गतानुभवांचं, दुःख वेदनेचे विसर्जन करायला जमेल आपल्याला, या जाणिवेने सुद्धा कढ आले असतील...

असो, पण हे मित्रा तू मला तुझ्या कारकिर्दीत खूप सांभाळून घेतलंस, अरे मोडून पडलेल्या या मित्राला इतरांप्रमाणे तू पण हात दिलास... अरे गेल्या १ वर्षाची मैत्री आपली पण तू खरच चांगली निभावलीस. तुझ्या दोन भावांनी म्हणजे २०१५ व २०१६ नी तर मला अक्षरशः तारून नेलं. 

मला माहिती आहे, मी तुला अधून मधून भेटत जा म्हंटल तरी ते शक्य नाही, ब्रम्हदेवाच्या कालमापन प्रोटोकॉल मध्ये बसत नाही ते.....

असो, थँक्स... गुडबाय... टेक केयर

अलविदा २०१७  🙏


© प्रमोद जोशी

फुलपाखरांचे अंतरंग - ३

फुलपाखरांचे अंतरंग -३

हे सॅम, hi

Hi, मानस, आज एकटाच, वैदेही कुठंय!

अरे, समीर! येईल ती , म्हणजे निघालीय, पोहोचेल.

बरं बाकी सगळी कुठं आहेत, आज प्लॅन फिक्स आहे ना celebration चा!

अलबत, हे काय विचारणं झालं का?

ओके. समीर, ग्रेट!

ये ती बघ वैदेही पण आली, hi वैदेही!

Hi मानस, hi समीर!

बरं चला उशीर झालाय आधीच पटकन जाऊ या कॅन्टीनमध्ये!

कॅन्टीन मध्ये आधीच बाकी सगळे जमा आहेत ते बघून... hi friends! Good morning,

गुड मॉर्निंग वैदेही,

"काय अमित , वर्षाला आज निरोप द्यायचा ना !, आं आं काय!" वर्षाकडे तिरप्या नजरेने बघत गौरव म्हणाला.

"तू न गौऱ्या आता मार खाणार आहेस, बरेच दिवस धुतला नाही तुला..." अमित म्हणाला.

"मी कुठं काय केलंय, मी आपलं वर्षाला निरोप द्यायचं म्हणत होतो... ह्या ह्या वर्षाचा कंटाळा आला न आता.." वर्षाकडे बघत गौरव म्हणाला.

"गौरव !" वर्षानं गौरवला डाव्या हातानं एक सपाटा दिला.

काही सेकंद शांतता ... फक्त कॅन्टीन मधील किचन म्युझिक.

"ये वर्षा, बघ ना बघता बघता एक वर्ष संपलं, आणि नवीन वर्ष सुरु होतय...काही तासात." वैदेही म्हणाली

 "हो ना कधी धुमधडाक्यात कधी साध्या पद्धतीन .... पण नवीन वर्ष नेहमी च खूऊऊऊऊउप उत्सुकता घेऊन येत असतं नै ... " समीर म्हणाला.

"खर तर काय बदलत ? कॅलेंडरच पान पालटतो आपण नेहमीसारखे .... पण नेहमी पेक्षा खूप जास्ती कुतुहलाने ..." मानस म्हणाला,

" दोन चार दिवसांपूर्वी विचार करत होते , या वर्षीचा संकल्प काय करायचा ....????? संकल्प करण अवघड आणि पाळण त्याहून अवघड ... याच विचारात होते आणि वाटलं , नव्या वर्षाला काय वाटत असेल येताना ???? " वैदेही म्हणाली.

"चुकून काही भावना किंवा बुद्धी असेल च त्याला , तर नवीन वर्ष काय Feel करत असेल १ January ला !!!???" केतन म्हणाला,

"खूष होत असेल की घाबरत असेल ??? जाणार वर्ष काही हितगुज करत असेल का नव्या वर्षाशी ??? मोठ्ठ्यांनी सल्ला देण्याचा रिवाज ' वर्ष ' पण पाळत असतील का ???? खूष होत असेल न येणार वर्ष ,आपल आगमन धुमधडाक्यात साजर होतंय हे बघून , गर्व वाटत असेल त्याला ही थोडासा !!!" अमित म्हणाला.

"म्हणजे काय अमित, नक्कीच वाटत असणार ; " वर्षा म्हणाली,

"ठरवत असेल का एखाद वर्ष , आपण एखाद्या माणसाला काय देऊन जायचं किंवा काय घेऊन जायचं त्याच्याकडून ????  , कदाचित घाबरत ही असेल एखाद वर्ष ... भीती वाटत असेल त्याला त्याच्या स्वतःच्याच नशिबाची ...!!", केतन म्हणाला.

"हो ना आपण lucky नाही ठरलो तर एखादा माणूस नेहमीच आपल्याला ' फालतू वर्ष ' म्हणून लक्षात ठेवेल या भितीन , झोप लागत नसेल वर्षांनाही ...!!! हो ना वर्षा," अमित म्हणाला,

"एखाद वर्ष अविस्मरणीय ठरत असेल खूप सुखाचे चार क्षण देऊन , खूष करून टाकत असेल एखाद वर्ष माणसांना ...!!!" मानस म्हणाला,

" वर्षहि उत्सुकतेन वर्तमानपत्रात भविष्य बघत असतील .... आपल्याला काय काय करायचं याच Time -Table ठरवत असतील त्यानुसार ...!!! एखाद वर्ष चिडत असेल आदल्या वर्षावर , त्यान स्वतःच एखाद काम आपल्यावर ढकललं म्हणून .... " गौरव म्हणाला,

"किंवा एखाद वर्ष खूष होत असेल , मागच्या वर्षीच्या प्रयत्नांच फळ आपल्या काळात मिळाल म्हणून !!! " केतन म्हणाला.

"अरे हो हो हो, हे काय चाललंय, माझ्या तत्वज्ञानी मित्रानो,आपल्याला व्याख्यानाची तयारी नाहीये करायची...." समीर म्हणाला,

" बरं ते जाऊ दे ... सध्यातरी ३१ च celebration काय करायचं हे ठरवू या, नाही का? .... " वैदेही म्हणाली,

"आणि समीर हे काय तन्या कुठंय! " वर्षा म्हणाली,

"ते बघा, शंभर वर्षे आयुष्य आहे तुला ...!!!!" तन्याकडे पाहत मानस म्हणाला.

"तर friends,आता कोरम भरलाय, तेव्हा.....ए गौऱ्या तोपर्यंत १० वडे सांग..." समीर म्हणाला,

"पुरतील ना तेवढे, का आणि १० सांगू..." अमित म्हणाला, आणि हास्याचे फवारे उडाले.


© प्रमोद जोशी

Monday 25 December 2017

शाकंभरी

       कर्नाटक प्रांतात विजापूर जिल्ह्यात बदामी शहरापासून सहा मैलाच्या अंतरावर 'चोलचगुडू' या नावाचं एक लहानसं गाव असून, तिथे 'शाकंभरी' देवीचं स्थान आहे. या भागाला प्राचीनकाळी 'तिलकवन' असं नाव होतं, असा उल्लेख स्कंदपुराण आणि देवी भागवतात येतो. 
         फार प्राचीन काळी एकदा या भागात शंभर वर्षांचा दुष्काळ पडला होता. तेव्हा अन्न- पाण्यावाचून सर्व प्राणिमात्र तडफडू लागले. मानवासह सर्व प्राणी भूक- तहानेने व्यावूत्ळ झाले. तेव्हा सर्व जीवमात्राचं पालनपोषण करणार्‍या दयामयी देवी भगवतीला करुणा आली आणि तिने सर्वांना वाचविण्यासाठी हे एक नवे रूप घेतले.

         देवीनं आपल्या देहातून शाकभाजी अर्थात फळ, कंदमुळं निर्माण केली. त्याचबरोबर पाताळात जाऊन 'हरिद्रातीर्थाचं' पाणी आणून लोकांची क्षुधा तृष्णा भागवली. त्यांचं रक्षण केलं. देवीनं आपल्या देहातून शाकभाजी निर्माण केली म्हणून तेव्हापासून तिचं नाव 'शाकंभरी' असे पडलं. 
        शाकंभरी देवीला 'बदामी- बनशंकरी' असंही म्हणतात. तिलकवनात देवीनं पाताळातून हरिद्रातीर्थाचं पाणी आणल्यामुळे तिथं द्यान्य, भाजीपाला, झाडंझुडपं, फळांचे वृक्ष बहरले. लोकांना अन्नद्यान्यामुळं जीवदान मिळालं. मात्र, या क्षेत्राचा असा झालेला उत्कर्ष दैत्यांना पाहवला नाही. त्यांनी तिथे जाऊन अन्नद्यान्याची नासधूस करून सर्व लोकांना त्रास दयायला सुरुवात केली. तेव्हा देवीने वाघावर स्वार होऊन आपल्या नऊ कोटी सखींसह दैत्यांवर चाल केली आणि त्यांचा निःपात केला. 
      देवीचा हा पराक्रम पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी हरिद्रातीर्थ आणि तैलतीर्थ यांच्यामध्ये देवीची सिंहारूढ मूर्ती स्थापन केली. तीच ही शाकंभरी देवी. ती वनामध्ये निवास करून राहिली म्हणून तिचं नाव 'बनशंकरी' असं झालं. तिलकवनात जेव्हा दुष्काळ  पडला, तेव्हा देवीनं आपल्या शंभर नेत्रातून दयादृष्टी  या भागावर टाकली आणि उत्तम पाऊस झाला म्हणून तिला 'शताक्षी' असंही म्हणतात, असा उल्लेख श्री शिवपुराणातल्या उमासंहितेत केला आहे.

        शाकंभरी ही 'धन धान्य  समृद्धीची' देवता आहे. तिच्याच कृपेमुळे दरवर्षी वेळेवर उत्तम पाऊस होऊन भूमीतून उगवणार्‍या जोमदार धान्य पिकांमध्ये मोत्यासारख्या टपोर्‍या दाण्याची कणसं अवतीर्ण होतात.
        एकदा अरुण नावाच्या महाअत्याचारी असुराने स्वर्गातल्या देवांच्या पत्नीचं शील हरण करण्याचा प्रयत्न चालविला. तेव्हा सर्व देवपत्नी आपल्या शीलाचं रक्षण करण्यासाठी भ्रमराची रूपं घेऊन देवीभगवतीकडे अभय मागण्यासाठी आल्या. तेव्हा देवीनं 'भ्रामरी'चं रूप घेऊन अरुण दैत्याचा संहार केला. तेव्हापासून तिला 'भ्रामरी' हे नाव प्राप्त झालं.
          देवी भगवतीच्या 'रणरागिणी स्वरूपातील' ही  दोन महत्त्वाची रूपे म्हणजे 'शाकंभरी' आणि 'भ्रामरी'. देवीचं 'शाकंभरी' हे रूप अन्नपूर्णास्वरूप आहे. कर्नाटक प्रांतात ही देवी फार प्रसिद्ध असून, ती अनेकांची कुलदेवता आहे. पौष महिन्यात शुद्ध पक्षात अष्टमी ते पौर्णिमा असं या देवीचं नवरात्र करतात.

या देवी सर्व भुतेषु। क्षुद्यारुपेण संस्थिता।
नमः तस्यै नमः तस्यैः। नमः तस्यैः नमो नमः॥

© प्रमोद जोशी

Sunday 24 December 2017

नाताळच्या पूर्वसंध्येच्या अनेक शुभेच्छा! 😊




सगळ्यांना .....
नाताळच्या पूर्वसंध्येच्या अनेक शुभेच्छा!
आपणा सर्वांसाठी सांताक्लॊज पोतडीभरून सुख घेऊन आलाय......
आत्मविश्वास, विद्या, चांगुलपणा, मेहनतीची प्रवृत्ती व हिम्मत, कष्टाची तयारी, आनंदी वृत्ती, उत्तम आरोग्य, थोरामोठ्यांचे आशीर्वाद व प्रेम सगळे कसे ठासून भरलेय त्याच्या थैलीत.

उघडताय ना दार?      काय?  








© प्रमोद जोशी

प्रसार माध्यमातील कलह

सहज आठवलं...

मागे एकदा दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती... काहीशी अशा आशयाची ..

कोल्हापुरात खपात 'सकाळ' नंबर वन'

लगेच दुसऱ्याच दिवशी ‘दै. पुढारी’ने पण इंडियन रिडरशिप सर्वेचा दाखला देत प्रत्त्युत्तर केलं होतं...

 “दुपटीहून अधिक वाचकसंख्येने पुढारीच्या निर्विवाद वर्चस्वावर पुन्हा शिक्का मोर्तब”

खरं तर या सगळ्याला सुरवात तशी बऱ्याच आधीपासून झाली होती. म्हणजे बघा पुढारीने जेव्हा पासून पुण्यात पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासून या वादाला तोंड फुटत गेलं. कदाचित आपण सगळ्यांनी हे याची देही याची डोळा बघितलेच असेल; पुढारीने ज्यावेळी पुणे आवृत्ती चालू केली त्यावेळी त्यांची जाहिरातच काहीशी अशी होती

“आता ‘सकाळचं’ पाहिलं काम ‘पुढारी’ वाचायचं!!!”;

पी एम टी च्या अनेक बसेसवर हि जाहीरात त्यावेळी झळकत होती. आता पुढारीने अशी जाहीर कुरापत काढल्यावर सकाळ कसं गप्प बसेल?

गपा की राव!!!

त्यांनी मग कोल्हापूर आवृत्तीचे दर बिझनेस पोलीसी च्या नावाखाली कमी केले आणि मग ‘मिडिया वॉर’पेटलं; जवळपास आठवडा भर कोल्हापुरात हे धुमशान चालू होतं. पुढारीने विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनचा मुद्दा हाताशी धरून वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेला आपल्या बाजूने केलं; आणि मग काही वृत्तपत्र विक्रेत्यानी दै. सकाळ वर बहिष्कार टाकला.

दै. सकाळने हि मग माघार न घेता वितरणाची समांतर यंत्रणाच उभी केली. प्रथम नाव न घेता होत असलेल्या टीका नंतर वैयक्तिक पातळीवर होऊ लागल्या. याचाच परिपाक म्हणून सकाळ कोल्हापूर आवृत्ती चे संपादक पद दस्तूर खुद्द अभिजीत पवारांकडे आलं.

वास्तविक पाहता या वादाचा इतिहास फार जुना; मला वाटतं जेव्हा पासून दै. सकाळ न कोल्हापुरात पाय ठेवला तेव्हांपासून या वादाची ठिणगी पडली असावी, त्याच्या अगोदर दै. पुढारीची आणि त्यांच्या“परीवारा”चीच कोल्हापुरात मोनोपॉली होती; त्याला सकाळने दिलेले आव्हान पुढारीला आवडले नसावे त्यामुळेच पुढारीचा हा डबल द्वेष जन्माला आला असावा.

पुढे काय झालं माहित नाही; पण साधारण काही दिवसांनी तो वाद बहुधा थंड झाला. लोकांचे फुकट मनोरंजन करण्यापलीकडे यातून काही साध्य झालं असेल असं काही वाटत नाही. पण परत परत ह्याच आशयाच्या बातम्यांनी हेच दाखवून दिले कि वाद जरी वरवर थंड झाला असला तरी आत कुठेतरी अजून ठिणगी धुमसते आहे.

आता पुढारी आणि सकाळ यात तुलना करायचीच झाली तर दोन्ही दैनिक वर्तमान पत्रे आहेत हा एक मुद्दा सोडला तर साम्य असे काही नाहीच.

सकाळ खरे तर ब्राम्हणी ढंगाचे पुणेरी दैनिक; सौम्य भाषेतून आशयपूर्ण आणि सृजनशील लिखाण बुद्धीजीवी लोकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा असलेले; तर पुढारी म्हणजे ‘अस्सल कोल्हापूरी’ चटपटीत भाषेत लोकांचे मनोरंजन करणारे दैनिक. दोन्ही दैनिकांचा वाचक वर्ग पूर्ण वेगळा पण तरीही त्यांच्या मधील हि इर्षा खरच अनाकलनीय आहे.


जाऊ दे आपल्याला काय करायचाय आपण तरी सकाळ आणि पुढारी दोन्ही पेपर रोज वाचतो तेहि इंटरनेट वर अगदी फुकटात; काय?

जाऊ द्या...

त्यांच्या त्यांच्यात काय घडतंय त्याच्याशी आपल्याला काय करायचंय.....

उगाच आपलं देणं ना घेणं अन कंदील लावून येणं...

आपण आपलं आपलेच सप्तरंग आणि आपलीच विविधा म्हणत त्यांना थोपटायच अंगाई गीत म्हणत...
नाई का?

© प्रमोद जोशी

Friday 22 December 2017

कठीण समय येता....

        या जगात क्वचितच असा एखादा माणूस सापडेल की ज्याला जीवनामध्ये कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागलेले नाही. जोपर्यंत जगणे सुरु आहे तोपर्यंत सुख आणि दु:ख हि खिलारी जोडी आपल्याला साथ देत असते. पण एक आहे की कोणत्याही प्रसंगातून गेल्यावर आपणाला काही तरी शिकायला मिळतं; मग तो प्रसंग आनंदी असू दे किंवा क्लेशदायी. प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रसंग त्या व्यक्तीला, त्याच्या आप्तस्वकीयांना काही तरी शिकवून जातो. इतिहास साक्षीदार आहे की ज्या व्यक्ती अशा कठीण प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्या आहेत त्यांनाच पुढे यश मिळालेले आहे. एवढंच नव्हे तर सातत्त्याने यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. जो माणूस अशा कठीण प्रसंगात सुद्धा न खचता धैर्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तोच पुढे एखादया आयडॉल पुरस्काराने सन्मानित होतो.

     खरं तर कठीण प्रसंगातून जाताना मी काय,तुम्ही काय , आपण सगळेच विचलित होतो . आता काय ? हा प्रश्न आपल्यापुढे असतो. पण आपल्याला तर प्रसंगाशी दोन हात करून त्याला तोंड द्यायचं असतं. न डगमगता आपणाला अशा प्रसंगाशी लढायला शिकायचं असतं. पण बऱ्याच वेळा आपलं अवसान गळून जातं. प्रसंगी नैराश्य, हताशपणा येतो.

      स्वामी विवेकानंद म्हणतात, अशा कठीण काळात जर तुमचा खरा मदत करणारा कुणी असेल तर ते तुम्ही स्वतः असता. तुम्ही स्वतःच तुमचे खरे मदतगार असता. 

जेव्हा केव्हा तुम्ही कठीण प्रसंगातून, अडचणीतून जात असाल तेव्हा तुम्ही क्षणभर विसरून जा की तुम्ही अडचणीत सापडले आहात. तुम्ही तुमची हि अडचण तुमच्या जवळच्या कोणत्या तरी प्रिय व्यक्तीची आहे असं समजा. आणि शांत व थंड डोक्याने तुम्ही विचार करा की आपल्या या प्रिय व्यक्तीला यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय मार्ग काढाल, त्या व्यक्तीला तुम्ही काय सल्ला दयाल. मग बघा तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला संकट मुक्त करण्याचा एखादा तरी कवडसा मिळतो की नाही. 

    आणि एकदा कवडसा मिळाला की काय अवघड आहे प्रकाश शोधणं. आणि खात्री बाळगा की तुम्हाला हा प्रकाशरूपी आशेचा किरण सगळं काही व्यवस्थित करण्यास मदतच करतो.

बऱ्याच लोकांना अशा कठीण प्रसंगात मनातल्या मनात कुढण्याची , स्वतःला दोषी ठरवून त्रास  करून घ्यायची सवय असते. माझ्याच बाबतीत असं का होतं, देवाला दुसरं कोणी सापडत नाही का, का माझ्याच मागे तो हात धुवून लागलाय असं म्हणून स्वतः बरोबरच दुसऱ्याला पण मानसिक त्रास देण्याची सवय असते.  जवळ जवळ प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्यावर जे संकट आले आहे ते फार मोठे आहे, आजपर्यंत कुणावरही असे संकट आले नसेल. हे असं का वाटतं कारण आपण इतर जणांना पण काही समस्या आहेत का याचा कधीही विचार केलेला नसतो. आणि त्यामुळेच आपल्याला वाटतं की आपल्यावरच पहाड कोसळला आहे. खरं तर आपल्यापैकी आपल्या एखादया सहकाऱ्याला याहीपेक्षा मोठ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलेले असतं. त्यानेही खंबीरपणे तोंड देत स्वतःला यातून बाहेर काढण्याचं बळ तुमच्या सारखच मिळवलेलं असतं. पण फक्त आपल्याला आणि आपल्यालाच असं वाटते की मी म्हणूनच यातून बाहेर पडलो , दुसरं कोणी असत तर केव्हाच त्याचं "अटॅक फटॅक सटॅक " झालं  असतं, म्हणजे तो या कठीण प्रसंगाचा बळी ठरला असता.. 

       खरं तर ईश्वरान प्रत्येकाला मन दिलंय, विचार करण्याची शक्ती दिलीय पण शेवटी हा मनुष्य स्वभाव आहे.  आणि तो बदलता येतो. पण बदलणे हा आपला स्थायीभाव असला पाहिजे. 

जगातले जवळ जवळ सर्व तत्ववेत्ते सांगून गेलेत की, जर तुमचं मन नकारात्मक विचार करत असेल तर नकारात्मक उर्जा  लहरी तयार होतील आणि जे चांगल घडणार आहे त्यामध्ये पण कदाचित अनेक अडचणी येऊ शकतील, पण तुम्ही जर सकारात्मक विचार करत असाल तर सकारात्मक उर्जा लहरी उत्पन्न होतील आणि जे अनुचित घडणार आहे ते सुद्धा कदाचित ते सुद्धा हि सकारात्मक उर्जा टाळू शकेल. लक्षात ठेवा,कठीण समय येता आपणच आपल्या कामास येतो.

So, be Positive. 




© प्रमोद जोशी

Thursday 21 December 2017

उशीर पथ्यावर

नुकतीच वाचनात आलेली एक विलक्षण घटना.

गुहागर मुंबई ST बस एका धाब्यावरून जेवण करून निघणार होती. प्रचंड पाऊस पडत होता आणि दोन प्रवासी न चढल्यामुळे कंडक्टर त्यांना शोधायला छत्री घेऊन उतरला होता. केवळ दोघे आले नाहीत म्हणून बस निघू शकत नसल्याचे पाहून प्रवासी वैतागले होते.

"ओ मास्तर चला जाऊ द्या, त्यांना राहू द्या इथच पावसामध्ये!" एकजण वैतागून ड्रायव्हर ला म्हणाला. "तेच ना जहागीरदार आहेत काय, ST म्हणजे काय यांच्या बापाचा माल आहे काय?" आणखी एक जण हेल काढत पचकला. पण ड्रायव्हर महाराज शांत होते , त्यांच्यासाठी हे रोजचेच होते. त्यांनी एकसारखा हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. आणि एकदाचे कंडक्टर साहेब त्या दोघांना घेऊन आले. सर्व प्रवासी एखाद्या कैदयाकडे पाहावे असे त्यांच्याकडे पाहू लागले.

आणि एकदाची बेल दोनदा वाजली आणि बस पावसात मार्गक्रमण करू लागली. मागून एक जीप भरदाव वेगानं बस ला ओव्हरटेक करून गेली. पण थोड्याच वेळात ती रस्त्यावरून उलट वळली व बस च्या दिशेने यायला लागली. नक्कीच काहीतरी वेगळे घडलंय याची ड्रायव्हर ला जाणीव झाली, त्याने बसचा वेग कमी केला व जीप वाल्याला विचारायचा प्रयत्न केला. पण जीप पुन्हा भरदाव वेगाने बसच्या उलट दिशेने निघून गेली. काहीच मिनिटांनी ड्रायव्हर च्या लक्षात आलं कि सावित्री नदीच्या पुलाच्या तोंडावर एक व्यक्ती हात करून थांबण्याचा इशारा करत आहे. त्याने गाडी जवळ नेऊन थांबवली तर त्या माणसाने सांगितले कि पूल मध्यावर तुटलाय आणि दोन बस व चार पाच गाड्या खाली कोसळून वाहून गेल्यात! ते ऐकल्यावर सर्वांच्या अंगावर काटा आला. खरे म्हणजे त्या तिन्ही बस एकापाठोपाठ जातात. पहिल्या दोन बस निघून गेल्या पण या बसमधील दोन प्रवाशांनी पाच दहा मिनिटे यायला वेळ लावला व त्यामुळं सर्वांचा जीव वाचला.

थोडक्यात काय त्या दोघांच उशिरा येणं सर्वांच्या पथ्यावरच पडलं , नाही का?




© प्रमोद जोशी

Tuesday 12 December 2017

नशीब

मनुष्य हा एक असा प्राणी आहे की त्याच्या आयुष्यात केव्हा काही घडेल हे कधी सांगता येत नाही. नशिबाचे फेरे त्याच्या बाबतीत कधी कसे पडतील याची काही शाश्वती देता येत नाही. नशिबाच्या अचानक पडलेल्या फाशांमुळे माणूस कसा दुर्दैवी असतो हे बऱ्याच वेळा दिसून येते.

नुकतेच एक सत्य घटना वाचण्यात आली.

मुंबईतील एका चाळीत निरुत्तर करणारी एक घटना घडली होती. ती चाळ एका बिल्डरला देण्यात आली. बिल्डरने सर्वाना सांगितले कि नियमाप्रमाणे तुम्हाला सध्या जेवढी जागा आहे तेवढी देण्यासाठी मी बांधील आहे. पण चाळीतल्या सर्वच खोल्या शंभर दीडशे फुटाच्या आहेत. नव्या बिल्डींग मधील सर्व फ्लॅट पाचशे फुटाच्या पलीकडे असणार आहेत. तेव्हा तुम्ही वरच्या स्क़ेअर फुटाचे पैसे द्या म्हणजे तुम्हालाही अधिक जागा वापरायला मिळेल. अर्थातच सर्वांनी ते मान्य केले. पण एका कुटुंबाकडे तेवढे पैसे नव्हते. कारण त्यांचा मुलगा मतीमंद होता. त्यांनी पै पै जमा केली होती ती त्याच्या भविष्यासाठी ! बिल्डर म्हणाला कि ठीक आहे. तुम्हाला तुमच्या जागेची बाजारभावाने येणारी किंमत देतो, तुम्ही जागेचा ताबा सोडा. पण ही जागा सोडून मुंबईत ते कुठे जाणार? इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली होती.

    आणि अचानक एक घटना घडली. एक दिवस बिल्डर चा मुलगा चाळी समोरच्या रस्त्याने गाडीने जात असताना त्याच्या गाडीखाली सापडून एक मुलगा मृत्युमुखी पडला. तो नेमका या दाम्पत्याचा मुलगा होता! सर्व सोपस्कार पार पडल्यावर बिल्डरने त्या दाम्पत्यासमोर हात जोडून प्रस्ताव ठेवला कि कृपया केस मागे घ्या. मी तुम्हाला एक फ्लॅट फुकट देतो. त्या दुर्दैवी माता पित्याला प्रश्न पडला कि मुलगा जिवंत होता तोपर्यंत फ्लॅट घेणे अशक्य होते. आता त्याच्या मृत्यूमुळेच फ्लॅट मिळतोय! मग या जागेच्या आनंद व्यक्त करायचा कि दु:ख ? 

नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते.

खरोखर किती बिकट प्रसंग असतात आयुष्यात, नाही का?



© प्रमोद जोशी

Monday 4 December 2017

एक था गुल

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ही बातमी न्यूज च्यानेल वर आली आणि मन सुन्न झालं.  एका जेष्ठ अभिनेता दिग्दर्शकाला रसिक कायमचे मुकले असं वाटून गेलं. 

बेखुदी में सनम .....
एक था गुल और एक थी बुलबुल...  
ओ मेरी शर्मिली.....
खिलते है गुल यहां...
नि सुलताना रे...
तुम बिन जाऊ कहां...
चंचल शीतल निर्मल...
घुंघरू कि तरह बजता ही रहा हुं ...

यासारखी किती तरी  गाणी  डोळ्यासमोर तरळून गेली जी अजूनही लोकांच्या मनात घर  करून आहेत.

शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरविषयी जेव्हाही चर्चा होते तेव्हा त्यांचे सहकलाकार अमिताभ बच्चन यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. पडद्यावरील आणि पडद्यामागील यांच्या मैत्रीची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना, चाहत्यांना भावली.


‘दीवार’, ‘नमक हलाल’, ‘शान’, ‘त्रिशूल’, ‘सुहाग’, ‘दो और दो पांच’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र भूमिका साकारली. त्याकाळी शशी आणि अमिताभ यांच्या जोडीला इतकी प्रसिद्धी मिळाली की दिग्दर्शक त्यांना घेऊन चित्रपट निर्मिती करण्यास उत्सुक असायचे.

अभिनय क्षेत्रातला चंद्र म्हणून कोणा अभिनेत्याचे नाव घ्यायचे असेल तर ते शशी कपूर यांचे घेतले पाहिजे. अभिनेता, निर्माता अशा भूमिका लिलया पेलत हा हरहुन्नरी कलाकार कायम सिनेमा व्यापत राहिला. आज हा कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. एका मोठ्या प्रवासाला त्याची सुरुवात झाली आहे. सिनेसृष्टीच्या आकाशातून चंद्र निखळला आहे अशीच काहीशी भावना सिनेरसिकांच्या मनात आहे.

खरेतर अभिनयाचे बाळकडू शशी कपूर यांना घरातूनच मिळाले होते. वडिल पृथ्वीराज कपूर, भाऊ राज आणि शम्मी कपूर यांच्यासोबत शशी कपूर यांनीही अभिनय क्षेत्रातच करियर करायचे ठरवले. बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांनी १९४० पासून मोठ्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. राज कपूर यांच्या ‘आग’ आणि ‘आवारा’ या दोन सिनेमांमध्येही त्यांनी सुरूवातीला काम केले. शशी कपूर म्हटले की स्मित हास्य करत आपल्या सहज अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता लोकांच्या समोर यायचा.

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा वयाने मोठे असूनही शशी कपूर यांनी ‘दिवार’ सिनेमात त्यांच्या लहान भावाची भूमिका स्वीकारली. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अँग्री यंग मॅनला ‘मेरे पास माँ है’ असे शांत आणि संयतपणे सांगणारा त्याचा लहान भाऊ शशी कपूर यांनी ज्या ताकदीने साकारला त्याला जवाब नाही. अमिताभ आणि शशी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी फक्त दिवार सिनेमात नाही तर ‘सुहाग’, ‘त्रिशूल’, ‘नमकहलाल’, ‘सिलसिला’ ‘कभी कभी’ या सिनमांमध्येही बघायला मिळाली. सिनेमा अमिताभ यांच्याभोवती केंद्रीत असला तरीही शशी कपूर यांची भूमिका मात्र खास असायची. त्यांनाही बघण्यासाठी लोक थिएटरमध्ये गर्दी करत असत. इतकेच नाही तर नलिनी जयंत, माला सिन्हा, तनुजा, नंदा यांसारख्या अभिनेत्रींपासून त्यांनी अगदी रेखा, राखी, नीतू सिंग यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. ‘जब जब फूल खिलें’ या सिनेमातील त्यांनी साकारलेली भूमिका आणि त्यातील गाणी चांगलीच गाजली.

त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी हा देखील त्यांच्या अभिनया इतकाच हिट विषय आहे. ‘खिलते हैं गूल यहाँ’, ‘घुंगरूकी तरह बजताही रहाँ हूँ मै’, ‘परदेसीयोंसे ना अखिया मिलाना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ही आणि अशी अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत.

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली गेली. कपूर कुटुंबातील हॅण्डसम अभिनेत्यांमध्ये शशी कपूर यांचा चार्म आणि त्यांच्या नुसत्या हसण्यानेच कित्येक तरुणी त्यांच्यावर फिदा होत्या. किंबहुना एक वेळ तर अशीही होती की, त्यांच्या चार्मसमोर रुपवान अभिनेत्रींचे सौंदर्यही फिके पडले होते राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर या त्रिकूटाने हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. पण, एक देखणा अभिनेता म्हणून तरुणींकडून शशी कपूर यांना विशेष पसंती मिळाली.

प्रेयसीवर प्रेम करण्याची त्यांची अनोखी पद्धत, नुसत्या हसण्याने तिचा राग कुठतच्या कुठे पळवण्याची त्यांची अदा आणि मोठ्या उत्साहात एखाद्या गाण्यावर थिरकण्याचा त्यांचा अंदाज आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत शशी कपूर यांच्या वाट्याला बरीच प्रसिद्ध गाणी आली. ‘ओ मेरी शर्मिली’पासून ते अगदी ‘खिलते है गुल यहाँ’ पर्यंतच्या प्रत्येक गाण्यामध्ये त्यांच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहणयाची संधी प्रेक्षकांना मिळाली. 

‘वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ’, या गाण्यात शर्मिला टागोरसोबत फ्लर्ट करणाऱ्या शशीजींच्या अदा, ‘एक था गुल एक थी बुलबुल’ या गाण्यातून अनेकांच्या काळजाला भिडल्या. चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील चमक आणि समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणाऱ्या या अभिनेत्याची ही वैशिष्ट्ये चित्रपटसृष्टीत त्यांना वेगळं स्थान देऊन गेली. अशा या  अभिनेत्याला विनम्र श्रद्धांजली ....

अलविदा शशिदा...   


© प्रमोद जोशी

Thursday 23 November 2017

स्वर्ग

एक प्रवासी आपल्या घोडा व कुत्र्याला घेऊन रस्त्यावरून चालला होता. जेव्हा ते एका मोठ्या विशालकाय अशा झाडाजवळून जात होते तेव्हा त्यांच्यावर आकाशातून एकदम वीज पडली आणि ते तिघे त्याच क्षणी मरण पावले. परंतु त्या तिघानाही आपण जिवंत नसल्याची जाणीव झाली नाही आणि ते चालतच राहिले. कधी कधी मृत शरीरांना आपला शरीरभाव सोडावयास वेळ लागतो.
त्यांचा प्रवास खूप लांबचा होता. आकाशात सूर्य चांगलाच तळपत होता. त्या तिघानाही खूप दम लागला होता. घामाने डबडबले होते आणि तहान पण खूप लागली होती. ते पाणी शोधत शोधत निघाले होते. रस्त्याच्या वळणावर त्यांना एक भव्य दिव्य असं द्वार दिसलं जे पूर्णपणे संगमरवरी होतं. त्या द्वारातून ते एका स्वर्ण जडित मंडपात आले. तिथून पुढे बरोबर मध्यभागी एक कारंजा होता आणि त्यातून पांढरे शुभ्र स्वच्छ पाणी फवारले जात होते.
तो प्रवाशी पहारेकऱ्याला म्हणाला "नमस्कार दादा, किती सुंदर जागा आहे हो !".
"हा स्वर्ग आहे." तो पहारेकरी म्हणाला.
"किती चांगले झाले नाही आम्ही चालत चालत स्वर्गात येऊन पोहोचलो, आम्हाला खूप तहान लागलीय हो." तो प्रवाशी म्हणाला.
"इथलं पाणी खूप छान आहे, तुम्ही पाहिजे तितकं पाणी पिवू शकता." पहारेकरी म्हणाला. "माझा घोडा आणि कुत्रा पण खूप तहानलेले आहेत." प्रवाशी म्हणाला.
त्या प्रवाशाने पहारेकरी दादाला धन्यवाद दिले आणि ते तिघेही पुन्हा मार्गस्थ झाले. आणखी खूप चालल्यावर ते एका बगीच्याजवळ पोहोचले. त्याचा प्रवेश दरवाजा खूपच जीर्ण होता आणि आत जाण्याचा मार्ग पण भरपूर धुळीने माखलेला होता. आत पोहोचल्यावर त्यानं पाहिलं कि एका झाडाच्या सावलीत एक माणूस डोक्याला टोपी घालून झोपलेला होता.
"माफ करा पण इथे जनावरांना पाणी प्यायला मनाई आहे." पहारेकरी म्हणाला.
हे ऐकून प्रवाशी निराश झाला, त्याला खूप तहान लागली होती पण त्याला एकट्याला पाणी प्यायचे नव्हते, त्याचे जोडीदार पण तहानलेले होते ना.
"नमस्कार दादा," तो प्रवाशी त्या माणसाला म्हणाला,"मी माझा कुत्रा आणि घोडा खूप तहानलेले आहोत , थोडं पाणी मिळेल का दादा?"
"हा स्वर्ग आहे." तो माणूस म्हणाला.
तो माणूस त्या प्रवाशाला एका दिशेला बोट करत म्हणाला," तिकडे तो खडकाळ भाग दिसतोय न तुम्हाला , त्याच्या मधोमध एक पाण्याचा झरा आहे. जा हवं तेवढं पाणी प्या अगदी तृप्ती होईपर्यंत."
ते तिघेही जण त्या ठिकाणी पोहोचले आणि तिघांनीही मनसोक्त पाणी पिऊन आपली तहान भागवली. नंतर तो प्रवाशी त्या माणसाजवळ आला आणि म्हणाला,"खूप खूप धन्यवाद दादा, छान पाणी होतं , अगदी तृप्त झालो आम्ही पाणी पिऊन."
"पण हि कोणती जागा आहे दादा,"
तो माणूस हसत हसत म्हणाला,"नाराज होऊ नका दादा, त्या संगमरवरी स्वर्ग वाल्यांचा आमच्यावर खूप उपकार आहे, त्या ठिकाणी असे सर्व लोक थांबतात जे स्वार्थी असतात. स्वत: साठी ते आपल्या जवळच्यांना ,मित्रांना सुद्धा सोडू शकतात."
"स्वर्ग? पण याच मार्गावर आम्हाला पाठीमागे एक संगमरवरी ठिकाण भेटलं. आणि तिथला रखवालदार पण म्हणाला कि हा "स्वर्ग" आहे म्हणून.
"नाही...नाही... तो स्वर्ग नाही तो नरक आहे."
प्रवासी गोंधळला, संभ्रम अवस्थेत तो म्हणाला ,"कृपा करून मला असं कोड्यात टाकू नका , हा नक्की काय प्रकार आहे , मला तर काहीच कळेनासे झाले आहे."
(ही कथा पौउलो कोएलो यांच्या "The Devil and Miss Pyrm" या पुस्तकातील कथेवर आधारित)
© प्रमोद जोशी

Tuesday 31 October 2017

चला पंढरीसी जाऊ

        काय असेल पंढरपूरचे वैशिष्ठ्य, जिथे लाखो लोक दर वर्षी पायी येतात, जी 'वारी' या नावाने प्रसिद्ध आहे? 
पंढरपूर हे असे स्थान आहे, जिथे परमेश्वर स्वत: आपल्या पत्नीसमवेत सगुण रुपात आहेत! 

          पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णुभक्त होऊन गेला. तो,पत्नी व आई वडिल सत्यवती आणि जानुदेव यांच्या बरोबर दिंडीरवन नावाच्या जंगलात रहात होता. पुंडलिक हा सत्गुणी पुत्र होता, पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई-वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले. हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले,तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली. ती पतीसमवेत, घोड्यावर ते आई-वडिल ज्या समूहा बरोबरजात होते, तेथे पोहोचले. वाटेत ते एका आश्रमाजवळ पोहोचले, जो 'कुक्कुटस्वामीं' चा होता. तेथे त्या सर्वानी एक-दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला.

         त्या रात्री सारे झोपी गेले, पण पुंडलिकाला झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील काही तरुण स्त्रीया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला,पाणी आणून, स्वामिंचे कपडे धुतले. आणि त्या बाहेरआल्या  व पुंडलिका जवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या. पुढील पहाटेही त्याला तेच दिसले. पुंडलिकाने त्यांच्या पायाशी जाऊन त्या कोणआहेत हे सांगण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या, की त्या गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपली पापे धुतात. त्यामुळेच होतात त्या अस्वच्छ. "आणि तू आई-वडिलांना वाईट वागणूक दिल्याने, महापापी आहेस." असे त्या म्हणाल्या.

         यामुळे त्याच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व आज्ञार्थी पुत्र झाला, व तो त्यांचा आदर राखू लागला.तेव्हा त्याने आई-वडिलांना विनंती केली, की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे.

         एके दिवशी, द्वारकाधिश श्रीकृष्ण (भगवान श्री विष्णु) एकटे असताना,  त्यांना मथुरेतील दिवसांची आठवण होते. त्यांना आठवतात त्या गोप-गोपिका आणि राधा. जरी ती मृत होती तरी, त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तींनी तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले. तेव्हाच रूक्मिणी कक्षात आली, आणि राधाने उभे न राहून त्यांचा निरादर केल्याने रूक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री विष्णु तिच्या शोधार्थ प्रथम मथुरा नंतर गोकूळला गेले, गोपाळांना भेटले. मग त्यांनीही शोध सुरू केला. ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले.

      शेवटी ते भीमा (किंवा चंद्रभागा) नदीतिरा जवळआले. सोबत असलेल्या गोपाळांना 'गोपाळपूर' येथे सोडून स्वतः दिंडीरवन जंगलात तिच्या शोधार्थ निघाले. आणि तिथे रूक्मिणी सापडल्यावर, तिचा राग शांत केला. नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले.

     पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आले आहेत, तरी आई-वडिलांच्यासेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ फेकली, त्यावर उभे राहण्यासाठी. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलां विषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णु आहेत विठ्ठल या अवतारात! 

विठ्ठल म्हणजे असा जो विटेवर उभा आहे.                               ( विठ्ठल  -  विट + ठल (उभा ठाकणे) )

तर असा हा पंढरीचा महिमा कळल्यानंतर कुणीही म्हणेल चला पंढरीसी जाऊ....विठुरायाचे दर्शन घेऊ



© प्रमोद जोशी



Monday 30 October 2017

पंढरीचा परब्रह्म

पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. 
      विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.
          संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. 
        श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.
 पुराणातील श्लोकाप्रमाणे 
                  वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ | 
                  ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||
अर्थ- 
वि- विधाता- ब्रम्हदेव 
ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर
ल- लक्ष्मीकांत- विष्णू
याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत. 
पांडुरंग साक्षात विठू माऊली काय वर्णन करावे त्या मूर्तीचे.....
         दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. 

विठुरायाच्या मूर्तीकडे पहाताच भान हरपते व आपोआप मुखातून शब्द बाहेर पडतात,

||जय जय राम कृष्ण हरी||    
||जय जय राम कृष्ण हरी|| 




© प्रमोद जोशी


Thursday 26 October 2017

आत्मविश्वास

        जाणकार असं म्हणतात कि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्याच मनाचा पक्का निर्धार असतो. ज्याचा आत्मविश्वास दृढ आहे,पक्का आहे त्याचा कोणत्याही क्षेत्रात विजय होतोच होतो, नव्हे विजयश्री त्याच्यासाठी माळ घेऊन उभीच असते. डॉक्टर आंबेडकर यांनी सुद्धा म्हंटले आहे कि आत्मविश्वासा सारखी जगात दुसरी कोणतीही शक्ती नाही.

  ज्याच्याकडे दृढ आत्मविश्वास आहे त्याला अशक्यप्राय गोष्टीही सहज साध्य होतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर एडिसन या शास्त्रज्ञाचे घेता येईल. त्यांनी जे काही शोध लावले, शोध लावताना, प्रयोग करताना कित्येक वेळी त्यांना अपयश आले असेल,परंतु अपयश येऊन देखील तोच प्रयोग पुन्हा पुन्हा आत्मविश्वासाने होण्यासाठी करायचे. आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरच ते नाव नवीन शोध लावू शकले. तर सांगण्याचा भाग एवढाच कि आज जर संशोधकांनी आत्मविश्वासाने काम केलेच नसते तर आज वेगवेगळे शोध लागलेच नसते. आज त्यांच्याच आत्मविश्वासाने केलेल्या निरनिराळ्या शोधानीच आज आपला पावलोपावली विजय होत आहे.

यशस्वी जीवनासाठी आत्मविश्‍वास एक खूप महत्त्वाचा गुण आहे. यश शिखर सर करणा-या बहुतेकांमध्‍ये हा गुण आढळतो. मग ते आमिर खान, सचिन तेंडूलकर, डॉ अब्दुल कलाम , धीरूभाई अंबानी  अशा अनेक यशस्वी व्यक्तिंचे उदाहरण देत येईल. आत्मविश्‍वास एक असा गुण आहे जो प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असतो.

   जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास self confidence हीच त्याची चावी आहे. जे काही करायचे आहे ते आपल्यातील हा key point कसा वाढीस लागेल यासाठी. 

so, be posstive and confident!!!




© प्रमोद जोशी

Friday 20 October 2017

अंतरंगातील दिवाळी

दिवाळी सण मोठा असतो आणि या सणात आनंदाला तोटा नसतो हे अगदी बालवाडी पासून आपल्या मनावर ठसलेलं असतं. खरं तर हा आनंद वाढतो तो दिव्यांच्या लखलखीत प्रकाशामुळे. जेव्हा पणतीतल्या ज्योती उजळतात, तेव्हा सगळं फिकं पडतं. काय जादू असते ना या ज्योतिमध्ये! संध्याकाळी दिवा लावल्यावर देव्हाऱ्यातील मूर्ती सुद्धा किती उजळून जातात व एकदम चैतन्यमय वाटू लागतात.

    अंधारातील भयाची छाया देखील या ज्योतीच्या प्रकाशा मूळे दूर होते. एवढीशी ज्योत पण माणसाच्या मनातील हुरहूर दूर करते. माणसाचं मन उजळवून टाकते.

उजळलेल्या या ज्योती पहिल्या की मनात विचार येतो की , कधी अज्ञान दूर करणारी तर कधी निराशा दूर करणारी ज्योत आपल्यालाही होता आलं तर. समाजात अशी भरीव कार्य करून यशाचे लख्ख उजेड पाडणारी व्यक्तिमत्वे आहेत. आपल्याला पण खारीचा वाटा उचलता आला तर!

    दिवाळीच्या निमित्तानं जागोजागी पणत्या लावल्या जात होत्या, प्रत्येक व्यक्ती एक एक पणती घेऊन उभा होता, एक एक करून प्रत्येकाला पणती लावायला सांगितली जात होती, अतिशय प्रसन्नतेने प्रत्येक जण पणती लावत होता, थोड्याच वेळात आसपासचा परिसर प्रकाशाने लख्ख उजळून गेला,
    शेकडो ज्योती प्रकाशमान झाल्या होत्या. त्या ज्योती तर तेजस्वी होत्याच पण त्या उजळवणारी मंडळीही तेजस्वी भासत होती, किंबहुना त्या सगळ्यांच्या अंतरंगात एक तेजस्विनी प्रकाशली होती.
    प्रत्येक माणूस म्हणजे एक ज्योत, किती छान कल्पना, हे जे काही या क्षणी भासले ते प्रत्यक्षात घडलं तर...
तर प्रत्येकाच्या अंतरंगात रोजच दिवाळी असेल .....


© प्रमोद जोशी 

चैतन्याची उधळण


        नुकतीच थंडी सुरु झालेली असते, दिवाळीचं आगमन होतं आणि त्यात दिव्याची उब घरादारात रेंगाळते.
सार्वजनिक ठिकाणी सुद्धा हजारो दिवे लावून दिवाळीचे जल्लोषात स्वागत होते.  पणत्यांबरोबरच आकाशदिवे लावून दिवाळीच स्वागत केल जात. बाजारात अनेक आकाराचे आकाशदिवे मिळत असले तरी घरी आकाशकंदील स्वतः करण्याची मजा काही वेगळीच.....शिवाय कल्पना शक्तीला आणि कलाकौशल्याला वाव...

     दिवाळीच आणि रांगोळीच नात अगदी जुनंच बरका! दिवाळीच्या निम्मिताने घरासमोर, देवळात, आणि सार्वजनिक जागी लहान, मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेरची रांगोळी हे संस्काराच प्रतिक मानल जात, रांगोळीतले रंग घरातील सुख समृद्धीची जाणीव करून देतात.

   दारात काढलेली रांगोळी ही मला तर पहिल्यापासूनच म्हणजे मला कळायला लागल्यापासून नेहमीच 'ग्रेट' काहीशी 'हटके' अशीच वाटत आली आहे.  मला नेहमी असं वाटतं की ही रांगोळी आपल्याला काहीतरी सांगतेय, जणू काही ती सुखाचं प्रतीक आहे आणि आपल्याला मूकपणे सांगतेय 'मी सुखात आहे, तुम्हाला पण सुख मिळो'. व्वा, क्या बात है, आजकाल या धावपळीच्या व धकाधकीच्या आयुष्यात वेळ कुणाकडे आहे आपणास मिळालेल्या वाट्याला आलेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला? मला वाटतं रांगोळी हा सर्वात उत्तम मार्ग असावा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा व इतरांना शुभेच्छा देण्याचा, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा. 'सर्व काही मंगलमय होवो, सर्वांचे कल्याण होवो' हेच ती रांगोळी प्रत्येक ठिपक्यातून सूचित करत असणार.

    बाजारात कितीही छान छान भेटकार्ड मिळत असली तरी आप्तेष्ट, नातलगाना देण्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेल्या अश्या शुभेच्छा पत्रकात काही वेगळच प्रेम असत, ते शब्दात नाही सांगता येणार. आजच्या मोबाईल संस्कृती मध्ये हे सगळं हरवत चाललंय.
 



© प्रमोद जोशी

Tuesday 17 October 2017

सुरेल मैफिलीची दिवाळी पहाट

दिवाळी तीच आहे. साजरी करणारी माणसे म्हणजे पिढी फक्त बदलते आहे. पिढी नुसार साजरी करण्याचे तंत्र बदलत चालले आहे. गत काही वर्षात तरुणांमध्ये संगीत, गायन-वादन शिकण्याचे वेड वाढले असून, त्याचाच हा परिपाक आहे की, दिवाळी पहाट ही संगीतिक सप्तसुरांनी रंगतदार ठरते आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल करण्याकरिता लोकनेत्यांपासून अनेक सामाजिक संस्था, उद्योजक, सेलिब्रेटीही पुढाकार घेत आहेत. मुंबईसह बहुतांश सर्व शहरांतून विविध गायकांच्या गाण्याच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत दिवाळीची सुरुवात होते. सुरूवातीच्या काळात फॅड म्हणून हिणवली गेलेली दिवाळी पहाटेच्या संगीत मैफलींची परंपरा आता चांगलीच मूळ धरू लागली आहे. किंबहुना तिने चांगलाच तग धरला आहे. सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ‘चतुरंग’ संस्थेने सुरूवातीला मुंबईत दिवाळीच्या पहाटे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ नाटकाचा प्रयोग केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीच्या सकाळीही रसिक कार्यक्रमासाठी घराबाहेर पडू शकतात, हे या प्रयोगास मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आढळून आले. ‘चतुरंग’ने अशा रितीने दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याचा मार्गच जणू  रसिकजनांना दाखवून दिला. दिवाळी हा तसा कौटुंबिक, आप्तस्वकियांसोबत साजरा केला जाणारा सण. पहाट मैफलींनी दिवाळीला सार्वजनिक अधिष्ठान दिले. एक आगळी वेगळी प्रतिष्ठा मिळवून द्यायचा प्रयत्न केला. या मैफलिनी रसिकांना एकत्र करून दिवाळीचा उत्साह संगीताच्या, गाण्याच्या संगतीत एकमेकांना वाटण्याची संधी दिली. एरवी नरक चर्तुदशीच्या पहाटे रेडिओवर लागणारे नरकासुराचा वध हे कीर्तन ऐकत अभ्यंगस्नान, आधी देवपूजा आणि मग अर्थात पोटपुजा.. हे दिवाळीचे घराघरातील पारंपरिक वेळापत्रक पहाटेच्या संगीत मैफलींनी बदलले.आता पहाटे चारला उठून, अभ्यंगस्नानासह सर्व अन्हिके उरकून सहा-साडेसहाला रसिक गाण्याच्या मैफलीला सभागृहात जागा अडवितात. मुंबई परिसरात सुरू झालेली दिवाळी पहाट संगीत मैफलींची परंपरा आता महाराष्ट्रातील सर्व लहान-मोठय़ा शहर, उपनगरांमधून रूजू लागली आहे. अनेक नामवंत आणि दिग्गज गायकांबरोबरच नवोदित कलावंतही दिवाळीच्या दिवसात उपलब्ध झालेल्या या नव्या व्यासपीठावर आपली कला सादर करतात. शास्त्रीय-उपशास्त्रीय, सुगम संगीत, चित्रपटसंगीत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम दिवाळीच्या काळात होतात. पहाटेच्या या मैफिलींमध्ये गाण्याबरोबरच रुचीपालट म्हणून खमंग गप्पा, सुसंवाद यांचाही बेत आखला जातो. पूर्वी ऑस्केस्ट्रामध्ये मिमिक्री असायची, तशा या गप्पा. व्यावसायिक नाटक, दूरचित्रवाणी मालिका अथवा सिनेसृष्टीतील अभिनेता-अभिनेत्री या गप्पाष्टकात सहभागी होतात. एवढय़ा भल्या पहाटे गाणं ऐकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या रसिकांच्या हाती चहाफराळ देण्याची कल्पकताही काही आयोजक दाखवितात.
आणि मग अस म्हणावसं वाटतं...

कसा करावा उत्सव
मैफिल सांगून गेली
रसिकांची मने उत्सवात
शतशः रंगून गेली...


© प्रमोद जोशी

उत्साहमयी दीपोत्सव

दिवाळी हा सण प्रत्येकाच्या जीवनातील सर्वाधिक मोठा व आनंदाचा असून प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचं स्नेहपूर्वक संवर्धन करतो. दिवाळी....किती आनंद. केवळ कुटुंबातच नाही. सा-या धरणीवर. जिथे नजर जाते तिथे. कोपरान् कोपरा उजळलेला. मनाला आनंद देणारी तरी बोचणारी थंडी. उबदार हवा. सूर्यांची किरणे हवीहवीशी वाटणारी. तरीही दुपारी थोडी तापविणारी. शरीरावर नाजूकपणे पसरणारी. पावसाळ्यात ओल्या झालेल्या मातीला थंडावा देणारी. शेतीत लावलेल्या बीजाला अंकूर फुटविणारी.
 
दिपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव असतो... नात्यांचा सण ! दिवाळीच औचित्य साधून घरादारात, रस्त्यांवर, उद्यानात, पारंपारिक वास्तुत, सार्वजनिक स्थळांमध्ये हजारो दिवे लावून दिपोस्तव साजरा केला जातो. नात्यातला ओलावा टिकून राहण्यासाठी दिवाळी एक हक्काचा उत्सव.

दिवाळी म्हणजे चैतन्य,
दिवाळी म्हणजे उत्साह,
दिवाळी म्हणजे धमाल,
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे रोशनाई,
दिवाळी म्हणजे आप्तेष्टांच्या भेटीगाठी
दिवाळी म्हणजे भेटवस्तू, मिठायांची देवाणघेवाण,
दिवाळी म्हणजे शुभेच्छापत्र, रांगोळ्या अन अभ्यंगस्नान

दिवाळीचा महोत्सव खरच काही खास असतो, नेत्रदीपक चैतन्यदायी असे वातावरण असत,  ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान येणारा हा उस्तव सात दिवसांचा...पण त्यातले चार दिवस अधिक जल्लोषात साजरे केले जातात, प्रत्येक दिवसाच आगळ वेगळ महत्व.
    अश्विन कृ. एकादशी म्हणजेच रमा एकादशीला पहिला दिवा लावण्याची अगदी जुनी प्रथा,
दुसरा दिवस म्हणजे द्वादशीचा म्हणजेच वासुबारसेचा, ह्या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, सवाष्णी गोमातेला गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात, मग गोमातेला वंदन करून पुढील सुखकर आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले जातात. गोमातेमध्ये तेहतीस कोटी देव सामावले असल्याची श्रद्धा असल्याने गोमातेला केलेले वंदन थेट तेहतीस कोटी देवांपाशी पोहोचते असे मानतात.
त्या नंतर येते ती धनत्रयोदशी , ह्यादिवशी देवांचे वैद्य 'धन्वंतरी' ह्यांची पूजा होते. ह्यादिवाशीच यमदीपदान असते. यमासाठी कणकेचा दिवा लावला जातो. यमाची दिशा 'दक्षिण' म्हणून हा दिवा दक्षिणेला ज्योत येईल अश्या पद्धतीने ठेवला जातो.
                 दुसऱ्या दिवशी येते ती नरकचर्तुदशी, हीच दिवाळी पहाट! अशी दंत कथा आहे की ह्या दिवशी जो सूर्योदयानंतर उठेल किंवा स्नान करेल तो नरकात जाईल. वास्तविक स्वर्ग, नरक ह्या सर्व कल्पना माणसाच्याच पण काही का असेना दिवाळीच्या पहाटे पहाटे उठून आईकडून सुगंधित तेल, उटन लावून घ्यायच आणि मग कढत्या पाण्याने स्नान! वाह !!!! दिवालीका मजाही कुछ और है! दिवाळी पहाटे  नवीन नवीन कपडे घालून घर पणत्यांनी भरून टाकायचं.. त्यानंतरच  देवदर्शन, कुटुंबासमवेत यथेच्छ फराळ, गप्पा टप्पा जवाब नही!
              नंतरच्या दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन, लक्ष्मी घरी नांदावी म्हणून तिची पूजा केली जाते.
             त्यानंतरचा दिवस म्हणजे कार्तिक शु. प्रतिपदा, बलिप्रतिपदा किंवा  पाडवा नवीन जोडप्यातील नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी आणि जुन्यांमधला आहे तसाच टिकवण्यासाठीचा खास दिवस! ह्यादिवशी बायको नवऱ्याला ओवाळते. दुकानदारांसाठी हा वर्षाचा पहिला दिवस असतो. त्यांच्या जमाखर्चाच्या वहीची पूजा आदल्या दिवशी केली जाते. बळी राजा ह्याच दिवशी दैत्यांवर विजय मिळवून परतला होता त्यामुळे ह्या दिवशी बळी राजाचेही स्मरण केले जाते.
             त्या नंतर येते यमद्वितीया किंवा भाऊबीज , भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिच्या कडून ओवाळून घेतो, अस म्हणतात ह्या दिवशी यमही त्याच्या बहिणीकडे यमिकडे जाऊन ओवाळून घेतो.
ह्या चारही दिवसातले खरे सार, आणि आकर्षणाचा विषय म्हणजे दिवे... पणत्या, आकाशदिवे, इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा लावून जमीन, आकाश उजळवून टाकले जाते.
एकूणच हा दीपोत्सव आनंदाचा, प्रसन्नतेचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा घेऊनच येत असतो. काळानुसार बदल होत गेला त्यामध्ये. आता चाळीतली दिवाळी जरी सर्वत्र पहायला मिळत नसली तरी तिची आठवण मात्र येत राहते किंबहुना ती मुद्दाम करून दिली जाते नव्या पिढीसाठी उठा उठा दिवाळी आली .... असं म्हणत म्हणत.

दिवाळी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

Wednesday 11 October 2017

सात अक्षरी जादुई स्वप्न

अमिताभ बच्चन...! सात जादुई अक्षरं आणि दोन भारदस्त शब्द. अमिताभ म्हणजे सूर्य. हिंदी चित्रपटसृष्टीच्या क्षितिजावर उगवलेला. रूपेरी पडद्यावरील आपल्या तेजोमय अस्तित्वानं थिएटरमधल्या अंधारात तुमच्या-आमच्या भोवतीचं अप्रकाशित वलय प्रकाशमान करणारा. तुमचा-आमचा आवडता अमिताभ बच्चन...! अमिताभ बच्चन हे खरं तर केवळ दोन शब्द किंवा सात अक्षरं नाहीत. ते एक संपूर्ण वाक्य आहे. अभिनेता, स्टार, संवेदनशील व्यक्ती, सुसंस्कृत माणूस अशा कोणत्याही संज्ञेची ती दोन शब्दांतील व्याख्या आहे. का आवडतो अमिताभ इतका? कारण पडदा व्यापून राहणारं त्याचं अस्तित्व प्रेक्षक म्हणून आपल्याला दिलासा देतं आणि जगण्याच्या संघर्षात सर्वसामान्यांना कायमच येणारी आगतिकता आभासी जगात का होईना, विजयात परिवर्तित होते. 

अमिताभ आला, त्या काळात राजेश खन्नापासून धर्मेंद्रपर्यंत आणि जितेंद्रपासून शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर, शशी कपूर किंवा विनोद खन्नापर्यंत ‘हीरो’ मटेरियल असलेले अनेक जण होतेच की! देव आनंदही अजून कार्यरत होता; पण या सगळ्यांचं पडद्यावरचं किंवा बाहेरचं अस्तित्वही ‘चार्मिंग’ या सदरात मोडणारं होतं. अमिताभ मात्र हा असा एक चेहरा होता, ज्याला सामान्य माणसानं ‘रिलेट’ केलं. 

सत्तरच्या दशकापासून सुरू झालेला अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’चा प्रवास नव्वदच्या ‘अग्निपथ’, ‘हम’पर्यंत कायम राहिला. खरं तर ‘जंजीर’च्या आधी अमिताभनं केलेले अकरा-बारा सिनेमे हे त्याच्या नंतर तयार झालेल्या प्रतिमेशी पूर्ण विसंगतच आहेत. ‘सात हिंदुस्तानी’पासून सुरू झालेला त्याचा प्रवास अपयशाचाच होता. ‘आनंद’ आणि ‘नमक हराम’मध्ये दखल घेतली गेली, तरी ते सिनेमे त्याच्यापेक्षा जास्त राजेश खन्नाचेच होते. एक वेळ तर अशी होती, की अमिताभ बाडबिस्तरा गुंडाळून मुंबई सोडून जायचा विचार करत होता. कोलकात्यातली सुखाची नोकरी सोडून मुंबईत आला, तोच मुळी आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देऊन! आपल्याला अभिनयच करायचा आहे, असं आतून वाटल्यानंतर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी रूढार्थानं ‘सेटल’ झालेल्या आयुष्यापासून फारकत घेऊन नव्या स्वप्नामागे धावणं हे काही सोपं नाही. अमिताभनं ते केलं. फ्लॉप झालेल्या सलग ११ सिनेमांचं अपयश त्यानं पचवलं आणि तो टिकून राहिला. ‘अँग्री यंग मॅन’ची इतकी स्ट्राँग प्रतिमा निर्माण होण्यामध्ये सलीम-जावेद यांच्या लेखनाचा जितका वाटा आहे, तितकाच कदाचित त्याच्या या स्ट्रगलचाही आहे. त्याच्या डोळ्यांतला अंगार, भारदस्त शरीरयष्टी नसली, तरी देहबोलीत असलेला आत्मविश्वास आणि आवाजातलं ‘कन्व्हिक्शन’ या गोष्टी पराभवालाही पराभूत करणाऱ्या वाटतात, त्या त्यामुळेच. 

सभोवतालची परिस्थिती ‘गब्बरसिंग’ किंवा ‘प्रेम चोप्रा’सारखी अंगावर येते, तेव्हा त्याला सामोरं जाण्यासाठी ‘विजय’च लागतो. समकालीन इतर हीरोंच्या सिनेमांत ‘रोमान्स’च्या दरम्यान केवळ औपचारिकता म्हणून हाणामारीची दृश्यं येत असताना, अमिताभचे चित्रपट मात्र संघर्षाच्या कथाबीजांवरच उभे राहिले. ‘जंजीर’मध्ये पोलिस स्टेशनमध्ये आलेला गुंड खुर्चीत बसण्यापूर्वीच त्याची खुर्ची लाथेनं उडवणारा आणि ‘जब तक बैठने को कहाँ न जाये, खडे रहो’ असं बोलणारा पोलिस अधिकारी पब्लिकला त्या वेळी हवा होता. अमिताभच्या रूपानं पडद्यावर का होईना, त्यांचं हे स्वप्न साकार झालं. इतका लंबू हीरो त्यापूर्वी पब्लिकनं कधी पाहिला नव्हता, असा बुलंद आवाज ऐकला नव्हता, डोळ्यांच्या असल्या भाषेशी प्रेक्षकांची याआधी कधी ओळख नव्हती आणि स्वप्नं विकणाऱ्या जादूगाराशी अशी सलगी त्यांनी कधी केली नव्हती. पडद्यावरच्या नायकाशी रिलेट होणं, ही नवीनच गोष्ट प्रेक्षक करू लागले. अस्सलपणाला ‘कमर्शियल व्हॅल्यू’ देणारी ती खास अमिताभी अदाकारी होती. 

नव्वदच्या दशकामध्ये आपल्यातलं हीरोपण संपलंय आणि ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेची गरजही, याचंही नेमकं भान अमिताभला होतं. नव्वदच्या दशकामध्ये आपल्यातलं हीरोपण संपलंय आणि ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेची गरजही, याचंही नेमकं भान अमिताभला होतं. म्हणूनच ‘कौन बनेगा करोडपती’पासून परवाच्या ‘पिंक’पर्यंतच्या त्याच्या भूमिका त्याच्यातल्या ‘सुलझा हुआ’ कलाकाराचीच साक्ष देतात; पण तरी आमच्यासारख्या निस्सीम चाहत्यांना थिएटरमधल्या अंधारात चाचपडायला झालं, की अजूनही आठवतो तो ‘दीवार’मधला डायलॉग. थेट गुंडांच्या साम्राज्यात जाऊन त्याला आव्हान देत तो म्हणतो, ‘तुम मुझे वहाँ ढूँढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था।’ आम्ही टाळ्या पिटतो, शिट्ट्या वाजवतो, आनंदतो आणि म्हणतो, ‘आया, अमिताभ आया'.


अजूनही आठवतात ते टाळ्या घेणारे ते बंदया रुपायासारखे खणखणीत डायलॉग,

जाओ, पहले उस आदमी का साइन ले के आओ, जिसने मेरे बाप को चोर कहा था. पहले उस आदमी का साइन ले के आओ, जिसने मेरी मां को गाली दे के नौकरी निकाल दिया था. पहले उस आदमी का साइन ले के आओ, जिसने मेरे हाथ पर ये लिख दिया था... ये... उसके बाद, उसके बाद मेरे भाई तुम जहां कहोगे, मैं साइन कर दूंगा

आई कैन टॉक इंग्लिश, आई कैन वॉक इंग्लिश, आई कैन लाफ इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज ए वेरी फनी लैंग्वेज.

हम जहाँ खडे होते हैं line वहीं से शुरु हो जाती हैं

75 व्या वाढदिवसाच्या आपल्या बिग बी ला मनापासून शुभेच्छा 

Thursday 5 October 2017

टप्पोरा चंद्र

काय आज काय आहे? कशाचं एवढं प्लॅनिंग चाललंय आं?
अरे बाबा आज कोजागिरी आहे
अलीकडे तू कॅलेंडर बघायचं सोडून दिलं आहेस बघ.
तुझं कश्यात लक्षच नाही हल्ली.
एका चुकीमुळे बऱ्याचदा असं ऐकून घ्यावं लागतं आपल्याला.
तर सांगायचं मुद्दा हा की आज कोजागिरी पौर्णिमा. आज चक्क फुल्ल मुन, टप्पोरा चंद्र पहायला मिळणार.
त्याच्या शीतल रजत किरणांनी आणि चांदण्यांनी सिद्ध केलेलं मस्त मसाले दूध, सोबत आवडीचं स्नॅक्स.
शायरी, गाणी यांनी गाजवली जाणारी रात्र आणि आपला आशीर्वाद देण्यासाठी को-जागरती म्हणजे अजून कोण कोण जागं आहे हे पहायला येणारी माँ लक्ष्मी.
चांदणं कुणाला आवडणार नाही, विशेषतः नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रेमीकाना, जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्यांना,अगदी प्रेमाची नुकतीच चाहूल लागलेल्या सर्वाना.
लहानग्यांना चंद्रात चांदोबा किंवा चांदोमामा दिसतो.
पण कोणत्याही प्रेमीला किंवा पती पत्नीला अगदी ते आजोबा असले तरी आपल्या प्रिय चा चेहरा दिसतो तो याच टप्पोऱ्या चंद्रा मध्ये.
याच चंद्राला साक्षी ठेऊन प्रेमाची सरिता वाहते , तिला तिचा सागर मिळतो.
याच चंद्राला लहान मुलं मामा करतात तर प्रेमाची गणितं सोडवनारे त्याला आपली प्रिय मानतात.
एकूण मामला गंभीर आहे.
चंद्र म्हंटलं की जोडीला सूर्य पण येतो. पण दोघे पूर्णपणे विरुद्ध, एक शीतल तर एक उष्ण. आणि शीतल किंवा सौम्य गोष्टं कुणालाही आवडते, त्यामुळे पौर्णिमेचा चंद्रमा सुखकर वाटतो. जवळ असणाऱ्या किंवा नसणाऱ्या आपल्या प्रिय चं रूप त्याला चंद्रमा भासतं.
कदाचित त्यामुळंच लेखक व कवी मंडळींना सूर्या पेक्षा चंद्र भुलवतो आणि मग ओठावर सतत येणारी , गुणगुणली जाणारी काव्ये, गाणी, गझल , शायरी तयार होतात.
आणि मग एखादा शायर म्हणतो,
चंद्र आहे साक्षीला

कल रात चाँद बिलकुल
तेरे जैसा था
वो ही खूबसुरती, वो ही नूर,
वो ही गुरुर, और   वैसे ही....
तुम्हारी तरह दूर!


तर कुणी दुसरा म्हणतो,

वैसे चाँद तो दिन को कब निकलता हैं
वो तो रात को ही निकलता है

और बीच में अमावस तो आती हैं
वैसे तो वो पंद्रह दिन की होती है,

लेकीन इस बार बहुत लंबी है
लगता हैं अगले जनम तक

फुलपाखरांचे अंतरंग -२

विंदा आजोबा ,  अहो विंदा आजोबा
कुठे गेलेत हे सकाळी सकाळी, आज बाबा पण लवकर गेलेत ऑफिस ला, तिकडे अनिल दादा पण लवकर गेलाय असं मानस म्हणाला. खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आणि भरपुर काम दिसतंय एकंदरीत.
वैदेही अगं वैदू बाळा आवरलं का ग तुझं,
अहो विंदा आजोबा कुठे होतात तुम्ही, मी केव्हापासून शोधतेय तुम्हाला.
अगं बेटा आज कोजागिरी आणि दुधात साखर म्हणजे गुरुवार. दत्त दर्शन करून आलो. येतांना दूध व दुध मसाला पण घेऊन आलो. तुझे बाबा येईपर्यंत फक्कड दूध बनवीन. तुझ्या दादाला तर खूप आवडते मसाला दूध आणि बाबांना तर खूपच.
पण त्यांना जास्त देऊ नका बरं का विंदा आजोबा, त्यांना नंतर त्रास होईल. मला खूप काळजी वाटते त्यांची.
हं मुलांनी बाबाची काळजी करायची आणि बाबानी मुलांची. देवा काळजीच पीक तुझ्याकडे जास्त आहे का रे, म्हणून तू सगळ्यांना अगदी मोफत वाटत सुटला आहेस.
तुम्ही नं विंदा आजोबा खूप छान बोलता, असं वाटतं की तुम्ही बोलावं आणि मी ऐकत रहावं. कुठून मिळालं एवढे ज्ञान आणि संस्कार तुम्हाला. अगं एवढं मोठ्ठ आयुष्याचं विद्यापीठ आणि अनुभवरूपी गुरू सर्व काही शिकवून जातं बेटा.

विंदा आजोबा, एक विचारू.
अगं बेटा, एक काय दहा विचार, का गं काही अडचण आहे का, नाही म्हणजे माझ्या आवाक्यातली असेंल तर मार्ग काढू शकेन.
नाही नाही विंदा आजोबा मला कोजागिरी बद्दल फारसे काहीच माहीत नाही, म्हंटल तुमच्या कडून मिळवावी माहिती.
हात्तीच्या, एवढंच ना, सांगतो की माहिती, ऐक बेटा-

चांदणं अंगावर घेत रात्र जागवण्याचा उत्सव म्हणजे कोजागरी. भारतीय सण ऋतुमानात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. प्रसन्न शरद ऋतूच्या आगमनात साजरा होणारा दिवस म्हणून कोजागरीची ओळख आहे. हा दिवस आश्‍विन प्रतिपदेला साजरा केला जातो. म्हणून तिला आश्‍विन पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी आकाशात ढगाआड लपलेला चंद्र आपले दर्शन देतो. हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो आणि चंद्राच्या शीतल, शांत किरणांची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा मसालेदार दुधाचा आस्वाद घेत उत्साहात साजरी केली जाते.....

कोजागरीच्या रात्री देवी महालक्ष्मी ‘को जागर्ति’ असे विचारत प्रत्येक घराघरात डोकावते. कोण जागे आहेत ते पाहते. जे जागे आहेत त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. येथे नुसते ‘जागे राहणे’ हे अभिप्रेत नाही. जागे राहणे म्हणजे ‘न झोपणे नव्हे’ तर जागृती, सावधानता. कोजागरीच्या रूपाने प्रत्येक घरात डोकावणारी ही लक्ष्मी या जागृतीचे प्रतीक आहे. कोजागरी म्हणजे ‘जागृतीचा संदेश.’शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्ताने शरीराला त्रास होऊ नये यासाठी सुवासिक जल, थंड पेयं घ्यावीत, चंदप्रकाशात बसावं, मोत्याच्या माळा धारण कराव्या आणि चंदनादी शीतदव्यांचे लेप करावेत असं सांगितलं आहे.....

आपली कालगणनाच मुळी चंद्रकलांवर आधारलेली. चंद्राला सर्वोच्च मान मिळालाय तो आपल्या कालगणनेकडून. मराठी पंचांगात प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व आगळेवेगळे.... कोजागरी पौर्णिमा ही आपल्या प्रत्येक पूर्ववत पौर्णिमेकडून शौर्य, ज्ञान, सेवा, श्रद्धा, प्रेम इत्यादी गुण आत्मसात करून आपल्याला देते...!!! आश्‍विन पौर्णिमेला चंद्राची किरणे अतिशय शांत असतात. ती अंगावर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. आयुर्वेदातही त्याचे महत्त्व सांगितले आहे म्हणूनच या दिवशी चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे......

बाप रे, विंदा आजोबा किती छान समजावून सांगितलं तुम्ही, तुम्ही तर खरं म्हणजे प्राध्यापक व्हायला पाहिजे होतात. 
नाही ग, काहीतरीच काय, वाचन आणि अनुभवाची शाळा यातून जे मिळाले ते साठवून ठेवलं , बाकी काही नाही
तुम्ही न विंदा आजोबा चालतं बोलतं विद्यापीठ आहात.
वैदू बेटा, पुरे हं , उगाच या म्हाताऱ्या ला हरभऱ्याच्या झाडावर बसवू नकोस.
नाही हो , विंदा आजोबा, खरच तुम्ही ज्ञानी आहात.
बरं तू कॉलेज ला जाणार आहेस ना? मी पटकन नाश्ता गरम करतो. तुझा बाबा पण आज लवकर गेला ऑफिसात म्हणून लवकरच केला, सगळे खाऊन गेले म्हणजे बरं वाटतं.
वैदू बेटा, तुझा बाबा तुला काही बोलला का ग, नाही म्हणजे आजकाल तो जरा गप्प गप्प असतो, टेन्शन मध्ये दिसतो.
नाही काही बोलले बाबा, पण तुम्ही म्हणता ते मला पण जाणवतंय विंदा आजोबा.
आणि ऐक ना वैदू बेटा, मी ना आज दत्त गुरूंना प्रार्थना केली की, आमच्या वैदू बाळाचं म्हणजे बाबांच्या फुलपाखराचं सर्व काही चांगलं होऊ देत.
विंदा आजोबा , खरंच खूप खूप थँक्स, असे आजोबा सर्वाना मिळोत.

आणि मनातला मानस त्याचं काय?
आं आं, काय हो विंदा आजोबा,
अरेच्या लाजून पळाली वाटतं
पण पोर फार गोड आहे, मानस लेकाचा लकी आहे.

फुलपाखरांचे अंतरंग -१

नमस्कार वाचक इ मित्रहो,
सर्वप्रथम या ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत.

या ब्लॉगमधून चांगले लिहिण्याचा व देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.
माणसाला विचार करण्याची शक्ती देवानं दिली आहे, आणि त्यासाठो मन आणि मेंदू बहाल केला आहे.
हे मन इतके विचित्र आहे की ते नेहमी चिरतरुण च असतं. व्यक्ती वयानुसार बाकी सर्व शरीर थकत जातं, ते कुरकुर करू लागतं.  मनात नेहमी चांगले वाईट विचार येतात, ते सुखावते पण आणि दुखावते पण, दुःखी मन सुखावयाला काही वेळा खूप काळ जावा लागतो,  पण मनाला जर चांगली संगत आणि साथ  मिळाली तर व्यक्ती कुणीही कितीही वयाची असो मन हे फुलपाखरू बनून राहतं. ते बागडत रहातं. 
अशाच काही फुलपाखरु मनाचा, मनातील क्षणाचा, मनातील स्वगताचा प्रवाह आपणापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न "फुलपाखरांचे अंतरंग" या सदरामार्फत माझा राहील. मी आशावादी आहे, आपण नक्कीच याला चांगली दाद द्याल.

प्रमोद जोशी

*********************************************

हाय मानस,
कसा आहेस?
मी मस्त.
बरं मला सांग तू कशी आहेस वैदेही?
मी ना, मी सुध्दा मस्तच.

पण मगाशी तू फोन का उचलत नव्हतास मानस ?
अगं आज कोजागिरी आहे माहीत नाही का?
हो हो बाबा म्हणत होते सकाळी.
पण त्याचं काय. विषय बदलू नकोस. तू फोन का उचलला नाहीस ते सांग आधी.
अरे हो हो हो,  मला बोलून तर देशील.
अगं तेच तर सांगतोय ना , ऐक ना ,आज कोजागिरी ना मग काय बाबांनी सकाळी मी ब्रश केल्यानंतर मला लगेच बोलावलं आणि सांगितलं की आवरून लगेच ये, मला तुला एक काम सांगायचं आहे.
मग काय फोन सायलेंट वर ठेवला आणि आवरायला गेलो, तेवढ्यात तुझा फोन येऊन गेला, आणि मला मिस्ड कॉल्स बघायला वेळच मिळाला नाही, सॉरी.
एवढं कसलं काम होतं बाबांचं, की तुला इतकं बिझी राहावं लागलं.
त्याचं काय आहे ना वैदेही आम्ही सोसायटी मधले सर्व जण कोजागिरी ला धमाल करतो. पण त्याचं नियोजन आधी करावं लागतं. म्हणजे बघ ना , म्हणजे प्रत्येक घरातले किती जण सहभागी होणार, स्नॅक्स काय ठरवायचं ते किती मागवायचे , मसाला दूध किती लिटर हे सगळं ठरवून त्याचं बजेट ठरवायचं, सेक्रेटरी नि मंजुरी दिली की कामाला लागायचं. खरं तर हे सर्व अनिल दादा बघतो, पण यावर्षी तो जरा कामात आहे, जास्त वर्क लोड आहे म्हणत होता, ते प्रोजेक्ट विश्वास का काय ते, खूप गडबड आहे म्हणत होता. मग बाबा त्याला म्हणाले की, डोन्ट वरी मानस आहे ना , तर अनिल दादा पण ना, तिरका कटाक्ष टाकून म्हणतो कसा, काय सांगता आज मानस ला वेळ आहे, असेल असेल पण कसं आहे ना फक्त चंद्र उगवेपर्यंत. एकदा का चांद आला की कुठले स्नॅक्स आणि मसाला दूध, हो क्की नै रे मानस, गम्मत केली रे.. चिल अँड एन्जॉय, आणि गाणे गुणगुणत गेला कुठलं ते आपलं हे "चेहरा है या चांद खिला हैं"
बाबा मला म्हणाले, याला काय झालं रे एकदम, मी त्यांना म्हणालो काय माहित, अर्चना वहिनी ला विचारतो. ते माझ्यावरच ओरडले.. उगीच काहीतरी आचरट पणा करू नकोस. एक काम कर तू अनिल ने सांगितलंय तसं सगळं manage कर.
तर वैदेही ह्यात माझा वेळ गेला, जरा समजून घे ना प्लिज.
बरं मानस ऐक ना, तुझं काम तासात होईल का, माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे. मी तूला फोन करते मग कॉलेज वर भेटू. ओके बाय
बैस राधा, आई बाबांची आठवण येत नाही ना, कारण बरेच दिवस झाले त्यांना भेटून.
नाही बाबा खरं तर तुम्ही सगळे इतके चांगले आहात ना मला अजिबात मी दुसरीकडे आहे असं वाटत नाही.
बरं आज रात्री सोसायटी मध्ये कोजागिरी कार्यक्रम आहे तू पण यायचं आहेस.  का तुमचा काही वेगळा प्लॅन आहे, तुझा रे मानस?
आई शप्पथ बाबा, काय मनकवडे आहात हो तुम्ही ( अर्थात हे मनातल्या मनांत) , नाही तसं काही फिक्स नाही अजून.
अरे पण ते स्नॅक्स,दूध वाया जाईल ना तुमच्या वाटणीच.
नाही तसं काही होणार नाही आमची गोल्डन गॅंग असल्यावर कसली काळजी करता, समजा राहिलं तर आम्ही उद्या संपवू. हो की नै राधा?
हो हो नो प्रॉब्लेम.
बरं बाबा , माझं जरा काम आहे मी जाऊन येते तास दीड तासांमध्ये.
अगं राधा मानस निघालाच आहे तर त्याच्या बरोबरच जा ना, उगीच रिक्षा कशाला नाही का?
बरं चालेल
मानस , अरे जा लवकर, आणि राधाला पण ड्रॉप कर
हो बाबा,
हं चला राधा काकू
काय म्हणालास काय मानस?
नाही बाबा, राधाला चल म्हणालो
हं जावा जावा लवकर, नमनाला घडाभर तेल, कसं व्हायचं या मुलांचं, परमेश्वरा कठीण आहे रे बाबा

प्रमोद जोशी

Saturday 30 September 2017

विटेकरांची परंपरा - दसरा पालखी शर्यत

सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे.
दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळस्थान रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या दोन पालख्यांची आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठ्या, देवांना वारे घालणाऱ्या चवऱ्या, आबदागिरी, चांदीच्या काठ्या, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्या निनादात या पालख्या शर्यतीसाठी सज्ज होतात. या दोन्ही पालख्यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. काळेश्वर मंदिराजवळ पालख्या येतात. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यावेळी मूळस्थानची पालखी पाहुणी असल्याने या पालखीला पाच पाऊले पुढे थांबण्याचा मान दिला जातो. त्यानंतर उजव्या बाजूला मूळस्थानचे नागरिक तर डाव्या बाजूला विटेकर नागरिक पालखी घेऊन धावण्यासाठी सज्ज होतात.
विजयादशमी दिवशी सायंकाळी 5 वाजता या दोन देवांच्या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्वर मंदिर ते खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्यासाठी पालखीचे खांदेकरी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे या पालख्या शिलंगण मैदानाकडे धावतात. त्यावेळी रस्त्यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळस्थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यातून सुटका करुन घेत या दोन्ही पालख्या शिलंगण मैदानाकडे धाव घेतात. या मैदानात प्रथम पोहोचलेली पालखी विजयी घोषित केली जाते. त्यानंतर पाठीमागून श्री भैरवनाथ, श्री म्हसवडसिद्ध व श्री भैरोबा या देवांच्या पालख्या शिलंगण मैदानात जातात. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. आपट्यांची पाने (सोने) देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.
विजयादशमी दिवशी देवांच्या पालख्या पळविण्याच्या शर्यतीची परंपरा विटेकरांनी गेल्या 150 वर्षांपासून जोपासली आहे. जात, पात, धर्म, गट-तट आणि राजकारणाच्या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्वीरित्या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. विजयादशमी दिवशी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात जोपासलेली देवांच्या पालखी शर्यतीची परंपरा महाराष्ट्रात आजही सुप्रसिद्ध आहे. या शर्यती पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.

दसरा विजयाचे द्योतक

दसरा म्हणजेच दशहरा. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.

दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला 'नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस' असेही मानतात.' श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. त्यामुळे या दिवसाला 'विजयादशमी' असे नाव मिळाले आहे.
पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तो याच दिवशी. 
दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे. 
         या दिवशी राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे आणि उपकरणे साफसूफ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.
सर्व जिवांत प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी या दिवशी सर्व जीव एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानात ईश्‍वरी तत्त्व  आकर्षून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात शिवतत्त्वही जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे त्या दिवशी जिवाला आपोआप शिवाचीही शक्‍ती मिळते.