Thursday 5 October 2017

टप्पोरा चंद्र

काय आज काय आहे? कशाचं एवढं प्लॅनिंग चाललंय आं?
अरे बाबा आज कोजागिरी आहे
अलीकडे तू कॅलेंडर बघायचं सोडून दिलं आहेस बघ.
तुझं कश्यात लक्षच नाही हल्ली.
एका चुकीमुळे बऱ्याचदा असं ऐकून घ्यावं लागतं आपल्याला.
तर सांगायचं मुद्दा हा की आज कोजागिरी पौर्णिमा. आज चक्क फुल्ल मुन, टप्पोरा चंद्र पहायला मिळणार.
त्याच्या शीतल रजत किरणांनी आणि चांदण्यांनी सिद्ध केलेलं मस्त मसाले दूध, सोबत आवडीचं स्नॅक्स.
शायरी, गाणी यांनी गाजवली जाणारी रात्र आणि आपला आशीर्वाद देण्यासाठी को-जागरती म्हणजे अजून कोण कोण जागं आहे हे पहायला येणारी माँ लक्ष्मी.
चांदणं कुणाला आवडणार नाही, विशेषतः नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रेमीकाना, जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्यांना,अगदी प्रेमाची नुकतीच चाहूल लागलेल्या सर्वाना.
लहानग्यांना चंद्रात चांदोबा किंवा चांदोमामा दिसतो.
पण कोणत्याही प्रेमीला किंवा पती पत्नीला अगदी ते आजोबा असले तरी आपल्या प्रिय चा चेहरा दिसतो तो याच टप्पोऱ्या चंद्रा मध्ये.
याच चंद्राला साक्षी ठेऊन प्रेमाची सरिता वाहते , तिला तिचा सागर मिळतो.
याच चंद्राला लहान मुलं मामा करतात तर प्रेमाची गणितं सोडवनारे त्याला आपली प्रिय मानतात.
एकूण मामला गंभीर आहे.
चंद्र म्हंटलं की जोडीला सूर्य पण येतो. पण दोघे पूर्णपणे विरुद्ध, एक शीतल तर एक उष्ण. आणि शीतल किंवा सौम्य गोष्टं कुणालाही आवडते, त्यामुळे पौर्णिमेचा चंद्रमा सुखकर वाटतो. जवळ असणाऱ्या किंवा नसणाऱ्या आपल्या प्रिय चं रूप त्याला चंद्रमा भासतं.
कदाचित त्यामुळंच लेखक व कवी मंडळींना सूर्या पेक्षा चंद्र भुलवतो आणि मग ओठावर सतत येणारी , गुणगुणली जाणारी काव्ये, गाणी, गझल , शायरी तयार होतात.
आणि मग एखादा शायर म्हणतो,
चंद्र आहे साक्षीला

कल रात चाँद बिलकुल
तेरे जैसा था
वो ही खूबसुरती, वो ही नूर,
वो ही गुरुर, और   वैसे ही....
तुम्हारी तरह दूर!


तर कुणी दुसरा म्हणतो,

वैसे चाँद तो दिन को कब निकलता हैं
वो तो रात को ही निकलता है

और बीच में अमावस तो आती हैं
वैसे तो वो पंद्रह दिन की होती है,

लेकीन इस बार बहुत लंबी है
लगता हैं अगले जनम तक

फुलपाखरांचे अंतरंग -२

विंदा आजोबा ,  अहो विंदा आजोबा
कुठे गेलेत हे सकाळी सकाळी, आज बाबा पण लवकर गेलेत ऑफिस ला, तिकडे अनिल दादा पण लवकर गेलाय असं मानस म्हणाला. खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आणि भरपुर काम दिसतंय एकंदरीत.
वैदेही अगं वैदू बाळा आवरलं का ग तुझं,
अहो विंदा आजोबा कुठे होतात तुम्ही, मी केव्हापासून शोधतेय तुम्हाला.
अगं बेटा आज कोजागिरी आणि दुधात साखर म्हणजे गुरुवार. दत्त दर्शन करून आलो. येतांना दूध व दुध मसाला पण घेऊन आलो. तुझे बाबा येईपर्यंत फक्कड दूध बनवीन. तुझ्या दादाला तर खूप आवडते मसाला दूध आणि बाबांना तर खूपच.
पण त्यांना जास्त देऊ नका बरं का विंदा आजोबा, त्यांना नंतर त्रास होईल. मला खूप काळजी वाटते त्यांची.
हं मुलांनी बाबाची काळजी करायची आणि बाबानी मुलांची. देवा काळजीच पीक तुझ्याकडे जास्त आहे का रे, म्हणून तू सगळ्यांना अगदी मोफत वाटत सुटला आहेस.
तुम्ही नं विंदा आजोबा खूप छान बोलता, असं वाटतं की तुम्ही बोलावं आणि मी ऐकत रहावं. कुठून मिळालं एवढे ज्ञान आणि संस्कार तुम्हाला. अगं एवढं मोठ्ठ आयुष्याचं विद्यापीठ आणि अनुभवरूपी गुरू सर्व काही शिकवून जातं बेटा.

विंदा आजोबा, एक विचारू.
अगं बेटा, एक काय दहा विचार, का गं काही अडचण आहे का, नाही म्हणजे माझ्या आवाक्यातली असेंल तर मार्ग काढू शकेन.
नाही नाही विंदा आजोबा मला कोजागिरी बद्दल फारसे काहीच माहीत नाही, म्हंटल तुमच्या कडून मिळवावी माहिती.
हात्तीच्या, एवढंच ना, सांगतो की माहिती, ऐक बेटा-

चांदणं अंगावर घेत रात्र जागवण्याचा उत्सव म्हणजे कोजागरी. भारतीय सण ऋतुमानात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने साजरे केले जातात. प्रसन्न शरद ऋतूच्या आगमनात साजरा होणारा दिवस म्हणून कोजागरीची ओळख आहे. हा दिवस आश्‍विन प्रतिपदेला साजरा केला जातो. म्हणून तिला आश्‍विन पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी आकाशात ढगाआड लपलेला चंद्र आपले दर्शन देतो. हवेत हळूहळू गारवा वाढू लागतो आणि चंद्राच्या शीतल, शांत किरणांची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा मसालेदार दुधाचा आस्वाद घेत उत्साहात साजरी केली जाते.....

कोजागरीच्या रात्री देवी महालक्ष्मी ‘को जागर्ति’ असे विचारत प्रत्येक घराघरात डोकावते. कोण जागे आहेत ते पाहते. जे जागे आहेत त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. येथे नुसते ‘जागे राहणे’ हे अभिप्रेत नाही. जागे राहणे म्हणजे ‘न झोपणे नव्हे’ तर जागृती, सावधानता. कोजागरीच्या रूपाने प्रत्येक घरात डोकावणारी ही लक्ष्मी या जागृतीचे प्रतीक आहे. कोजागरी म्हणजे ‘जागृतीचा संदेश.’शरद ऋतूमध्ये वाढणाऱ्या पित्ताने शरीराला त्रास होऊ नये यासाठी सुवासिक जल, थंड पेयं घ्यावीत, चंदप्रकाशात बसावं, मोत्याच्या माळा धारण कराव्या आणि चंदनादी शीतदव्यांचे लेप करावेत असं सांगितलं आहे.....

आपली कालगणनाच मुळी चंद्रकलांवर आधारलेली. चंद्राला सर्वोच्च मान मिळालाय तो आपल्या कालगणनेकडून. मराठी पंचांगात प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व आगळेवेगळे.... कोजागरी पौर्णिमा ही आपल्या प्रत्येक पूर्ववत पौर्णिमेकडून शौर्य, ज्ञान, सेवा, श्रद्धा, प्रेम इत्यादी गुण आत्मसात करून आपल्याला देते...!!! आश्‍विन पौर्णिमेला चंद्राची किरणे अतिशय शांत असतात. ती अंगावर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. आयुर्वेदातही त्याचे महत्त्व सांगितले आहे म्हणूनच या दिवशी चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे......

बाप रे, विंदा आजोबा किती छान समजावून सांगितलं तुम्ही, तुम्ही तर खरं म्हणजे प्राध्यापक व्हायला पाहिजे होतात. 
नाही ग, काहीतरीच काय, वाचन आणि अनुभवाची शाळा यातून जे मिळाले ते साठवून ठेवलं , बाकी काही नाही
तुम्ही न विंदा आजोबा चालतं बोलतं विद्यापीठ आहात.
वैदू बेटा, पुरे हं , उगाच या म्हाताऱ्या ला हरभऱ्याच्या झाडावर बसवू नकोस.
नाही हो , विंदा आजोबा, खरच तुम्ही ज्ञानी आहात.
बरं तू कॉलेज ला जाणार आहेस ना? मी पटकन नाश्ता गरम करतो. तुझा बाबा पण आज लवकर गेला ऑफिसात म्हणून लवकरच केला, सगळे खाऊन गेले म्हणजे बरं वाटतं.
वैदू बेटा, तुझा बाबा तुला काही बोलला का ग, नाही म्हणजे आजकाल तो जरा गप्प गप्प असतो, टेन्शन मध्ये दिसतो.
नाही काही बोलले बाबा, पण तुम्ही म्हणता ते मला पण जाणवतंय विंदा आजोबा.
आणि ऐक ना वैदू बेटा, मी ना आज दत्त गुरूंना प्रार्थना केली की, आमच्या वैदू बाळाचं म्हणजे बाबांच्या फुलपाखराचं सर्व काही चांगलं होऊ देत.
विंदा आजोबा , खरंच खूप खूप थँक्स, असे आजोबा सर्वाना मिळोत.

आणि मनातला मानस त्याचं काय?
आं आं, काय हो विंदा आजोबा,
अरेच्या लाजून पळाली वाटतं
पण पोर फार गोड आहे, मानस लेकाचा लकी आहे.

फुलपाखरांचे अंतरंग -१

नमस्कार वाचक इ मित्रहो,
सर्वप्रथम या ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत.

या ब्लॉगमधून चांगले लिहिण्याचा व देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.
माणसाला विचार करण्याची शक्ती देवानं दिली आहे, आणि त्यासाठो मन आणि मेंदू बहाल केला आहे.
हे मन इतके विचित्र आहे की ते नेहमी चिरतरुण च असतं. व्यक्ती वयानुसार बाकी सर्व शरीर थकत जातं, ते कुरकुर करू लागतं.  मनात नेहमी चांगले वाईट विचार येतात, ते सुखावते पण आणि दुखावते पण, दुःखी मन सुखावयाला काही वेळा खूप काळ जावा लागतो,  पण मनाला जर चांगली संगत आणि साथ  मिळाली तर व्यक्ती कुणीही कितीही वयाची असो मन हे फुलपाखरू बनून राहतं. ते बागडत रहातं. 
अशाच काही फुलपाखरु मनाचा, मनातील क्षणाचा, मनातील स्वगताचा प्रवाह आपणापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न "फुलपाखरांचे अंतरंग" या सदरामार्फत माझा राहील. मी आशावादी आहे, आपण नक्कीच याला चांगली दाद द्याल.

प्रमोद जोशी

*********************************************

हाय मानस,
कसा आहेस?
मी मस्त.
बरं मला सांग तू कशी आहेस वैदेही?
मी ना, मी सुध्दा मस्तच.

पण मगाशी तू फोन का उचलत नव्हतास मानस ?
अगं आज कोजागिरी आहे माहीत नाही का?
हो हो बाबा म्हणत होते सकाळी.
पण त्याचं काय. विषय बदलू नकोस. तू फोन का उचलला नाहीस ते सांग आधी.
अरे हो हो हो,  मला बोलून तर देशील.
अगं तेच तर सांगतोय ना , ऐक ना ,आज कोजागिरी ना मग काय बाबांनी सकाळी मी ब्रश केल्यानंतर मला लगेच बोलावलं आणि सांगितलं की आवरून लगेच ये, मला तुला एक काम सांगायचं आहे.
मग काय फोन सायलेंट वर ठेवला आणि आवरायला गेलो, तेवढ्यात तुझा फोन येऊन गेला, आणि मला मिस्ड कॉल्स बघायला वेळच मिळाला नाही, सॉरी.
एवढं कसलं काम होतं बाबांचं, की तुला इतकं बिझी राहावं लागलं.
त्याचं काय आहे ना वैदेही आम्ही सोसायटी मधले सर्व जण कोजागिरी ला धमाल करतो. पण त्याचं नियोजन आधी करावं लागतं. म्हणजे बघ ना , म्हणजे प्रत्येक घरातले किती जण सहभागी होणार, स्नॅक्स काय ठरवायचं ते किती मागवायचे , मसाला दूध किती लिटर हे सगळं ठरवून त्याचं बजेट ठरवायचं, सेक्रेटरी नि मंजुरी दिली की कामाला लागायचं. खरं तर हे सर्व अनिल दादा बघतो, पण यावर्षी तो जरा कामात आहे, जास्त वर्क लोड आहे म्हणत होता, ते प्रोजेक्ट विश्वास का काय ते, खूप गडबड आहे म्हणत होता. मग बाबा त्याला म्हणाले की, डोन्ट वरी मानस आहे ना , तर अनिल दादा पण ना, तिरका कटाक्ष टाकून म्हणतो कसा, काय सांगता आज मानस ला वेळ आहे, असेल असेल पण कसं आहे ना फक्त चंद्र उगवेपर्यंत. एकदा का चांद आला की कुठले स्नॅक्स आणि मसाला दूध, हो क्की नै रे मानस, गम्मत केली रे.. चिल अँड एन्जॉय, आणि गाणे गुणगुणत गेला कुठलं ते आपलं हे "चेहरा है या चांद खिला हैं"
बाबा मला म्हणाले, याला काय झालं रे एकदम, मी त्यांना म्हणालो काय माहित, अर्चना वहिनी ला विचारतो. ते माझ्यावरच ओरडले.. उगीच काहीतरी आचरट पणा करू नकोस. एक काम कर तू अनिल ने सांगितलंय तसं सगळं manage कर.
तर वैदेही ह्यात माझा वेळ गेला, जरा समजून घे ना प्लिज.
बरं मानस ऐक ना, तुझं काम तासात होईल का, माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे. मी तूला फोन करते मग कॉलेज वर भेटू. ओके बाय
बैस राधा, आई बाबांची आठवण येत नाही ना, कारण बरेच दिवस झाले त्यांना भेटून.
नाही बाबा खरं तर तुम्ही सगळे इतके चांगले आहात ना मला अजिबात मी दुसरीकडे आहे असं वाटत नाही.
बरं आज रात्री सोसायटी मध्ये कोजागिरी कार्यक्रम आहे तू पण यायचं आहेस.  का तुमचा काही वेगळा प्लॅन आहे, तुझा रे मानस?
आई शप्पथ बाबा, काय मनकवडे आहात हो तुम्ही ( अर्थात हे मनातल्या मनांत) , नाही तसं काही फिक्स नाही अजून.
अरे पण ते स्नॅक्स,दूध वाया जाईल ना तुमच्या वाटणीच.
नाही तसं काही होणार नाही आमची गोल्डन गॅंग असल्यावर कसली काळजी करता, समजा राहिलं तर आम्ही उद्या संपवू. हो की नै राधा?
हो हो नो प्रॉब्लेम.
बरं बाबा , माझं जरा काम आहे मी जाऊन येते तास दीड तासांमध्ये.
अगं राधा मानस निघालाच आहे तर त्याच्या बरोबरच जा ना, उगीच रिक्षा कशाला नाही का?
बरं चालेल
मानस , अरे जा लवकर, आणि राधाला पण ड्रॉप कर
हो बाबा,
हं चला राधा काकू
काय म्हणालास काय मानस?
नाही बाबा, राधाला चल म्हणालो
हं जावा जावा लवकर, नमनाला घडाभर तेल, कसं व्हायचं या मुलांचं, परमेश्वरा कठीण आहे रे बाबा

प्रमोद जोशी