Tuesday 12 December 2017

नशीब

मनुष्य हा एक असा प्राणी आहे की त्याच्या आयुष्यात केव्हा काही घडेल हे कधी सांगता येत नाही. नशिबाचे फेरे त्याच्या बाबतीत कधी कसे पडतील याची काही शाश्वती देता येत नाही. नशिबाच्या अचानक पडलेल्या फाशांमुळे माणूस कसा दुर्दैवी असतो हे बऱ्याच वेळा दिसून येते.

नुकतेच एक सत्य घटना वाचण्यात आली.

मुंबईतील एका चाळीत निरुत्तर करणारी एक घटना घडली होती. ती चाळ एका बिल्डरला देण्यात आली. बिल्डरने सर्वाना सांगितले कि नियमाप्रमाणे तुम्हाला सध्या जेवढी जागा आहे तेवढी देण्यासाठी मी बांधील आहे. पण चाळीतल्या सर्वच खोल्या शंभर दीडशे फुटाच्या आहेत. नव्या बिल्डींग मधील सर्व फ्लॅट पाचशे फुटाच्या पलीकडे असणार आहेत. तेव्हा तुम्ही वरच्या स्क़ेअर फुटाचे पैसे द्या म्हणजे तुम्हालाही अधिक जागा वापरायला मिळेल. अर्थातच सर्वांनी ते मान्य केले. पण एका कुटुंबाकडे तेवढे पैसे नव्हते. कारण त्यांचा मुलगा मतीमंद होता. त्यांनी पै पै जमा केली होती ती त्याच्या भविष्यासाठी ! बिल्डर म्हणाला कि ठीक आहे. तुम्हाला तुमच्या जागेची बाजारभावाने येणारी किंमत देतो, तुम्ही जागेचा ताबा सोडा. पण ही जागा सोडून मुंबईत ते कुठे जाणार? इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली होती.

    आणि अचानक एक घटना घडली. एक दिवस बिल्डर चा मुलगा चाळी समोरच्या रस्त्याने गाडीने जात असताना त्याच्या गाडीखाली सापडून एक मुलगा मृत्युमुखी पडला. तो नेमका या दाम्पत्याचा मुलगा होता! सर्व सोपस्कार पार पडल्यावर बिल्डरने त्या दाम्पत्यासमोर हात जोडून प्रस्ताव ठेवला कि कृपया केस मागे घ्या. मी तुम्हाला एक फ्लॅट फुकट देतो. त्या दुर्दैवी माता पित्याला प्रश्न पडला कि मुलगा जिवंत होता तोपर्यंत फ्लॅट घेणे अशक्य होते. आता त्याच्या मृत्यूमुळेच फ्लॅट मिळतोय! मग या जागेच्या आनंद व्यक्त करायचा कि दु:ख ? 

नशीब नशीब म्हणतात ते आणखी वेगळे काय असते.

खरोखर किती बिकट प्रसंग असतात आयुष्यात, नाही का?



© प्रमोद जोशी