Saturday 30 September 2017

विटेकरांची परंपरा - दसरा पालखी शर्यत

सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे.
दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळस्थान रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या दोन पालख्यांची आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठ्या, देवांना वारे घालणाऱ्या चवऱ्या, आबदागिरी, चांदीच्या काठ्या, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्या निनादात या पालख्या शर्यतीसाठी सज्ज होतात. या दोन्ही पालख्यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. काळेश्वर मंदिराजवळ पालख्या येतात. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यावेळी मूळस्थानची पालखी पाहुणी असल्याने या पालखीला पाच पाऊले पुढे थांबण्याचा मान दिला जातो. त्यानंतर उजव्या बाजूला मूळस्थानचे नागरिक तर डाव्या बाजूला विटेकर नागरिक पालखी घेऊन धावण्यासाठी सज्ज होतात.
विजयादशमी दिवशी सायंकाळी 5 वाजता या दोन देवांच्या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्वर मंदिर ते खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्यासाठी पालखीचे खांदेकरी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे या पालख्या शिलंगण मैदानाकडे धावतात. त्यावेळी रस्त्यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळस्थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यातून सुटका करुन घेत या दोन्ही पालख्या शिलंगण मैदानाकडे धाव घेतात. या मैदानात प्रथम पोहोचलेली पालखी विजयी घोषित केली जाते. त्यानंतर पाठीमागून श्री भैरवनाथ, श्री म्हसवडसिद्ध व श्री भैरोबा या देवांच्या पालख्या शिलंगण मैदानात जातात. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. आपट्यांची पाने (सोने) देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.
विजयादशमी दिवशी देवांच्या पालख्या पळविण्याच्या शर्यतीची परंपरा विटेकरांनी गेल्या 150 वर्षांपासून जोपासली आहे. जात, पात, धर्म, गट-तट आणि राजकारणाच्या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्वीरित्या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. विजयादशमी दिवशी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात जोपासलेली देवांच्या पालखी शर्यतीची परंपरा महाराष्ट्रात आजही सुप्रसिद्ध आहे. या शर्यती पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.

दसरा विजयाचे द्योतक

दसरा म्हणजेच दशहरा. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.

दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला 'नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस' असेही मानतात.' श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. त्यामुळे या दिवसाला 'विजयादशमी' असे नाव मिळाले आहे.
पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तो याच दिवशी. 
दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे. 
         या दिवशी राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे आणि उपकरणे साफसूफ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.
सर्व जिवांत प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी या दिवशी सर्व जीव एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानात ईश्‍वरी तत्त्व  आकर्षून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात शिवतत्त्वही जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे त्या दिवशी जिवाला आपोआप शिवाचीही शक्‍ती मिळते.