Friday 20 October 2017

अंतरंगातील दिवाळी

दिवाळी सण मोठा असतो आणि या सणात आनंदाला तोटा नसतो हे अगदी बालवाडी पासून आपल्या मनावर ठसलेलं असतं. खरं तर हा आनंद वाढतो तो दिव्यांच्या लखलखीत प्रकाशामुळे. जेव्हा पणतीतल्या ज्योती उजळतात, तेव्हा सगळं फिकं पडतं. काय जादू असते ना या ज्योतिमध्ये! संध्याकाळी दिवा लावल्यावर देव्हाऱ्यातील मूर्ती सुद्धा किती उजळून जातात व एकदम चैतन्यमय वाटू लागतात.

    अंधारातील भयाची छाया देखील या ज्योतीच्या प्रकाशा मूळे दूर होते. एवढीशी ज्योत पण माणसाच्या मनातील हुरहूर दूर करते. माणसाचं मन उजळवून टाकते.

उजळलेल्या या ज्योती पहिल्या की मनात विचार येतो की , कधी अज्ञान दूर करणारी तर कधी निराशा दूर करणारी ज्योत आपल्यालाही होता आलं तर. समाजात अशी भरीव कार्य करून यशाचे लख्ख उजेड पाडणारी व्यक्तिमत्वे आहेत. आपल्याला पण खारीचा वाटा उचलता आला तर!

    दिवाळीच्या निमित्तानं जागोजागी पणत्या लावल्या जात होत्या, प्रत्येक व्यक्ती एक एक पणती घेऊन उभा होता, एक एक करून प्रत्येकाला पणती लावायला सांगितली जात होती, अतिशय प्रसन्नतेने प्रत्येक जण पणती लावत होता, थोड्याच वेळात आसपासचा परिसर प्रकाशाने लख्ख उजळून गेला,
    शेकडो ज्योती प्रकाशमान झाल्या होत्या. त्या ज्योती तर तेजस्वी होत्याच पण त्या उजळवणारी मंडळीही तेजस्वी भासत होती, किंबहुना त्या सगळ्यांच्या अंतरंगात एक तेजस्विनी प्रकाशली होती.
    प्रत्येक माणूस म्हणजे एक ज्योत, किती छान कल्पना, हे जे काही या क्षणी भासले ते प्रत्यक्षात घडलं तर...
तर प्रत्येकाच्या अंतरंगात रोजच दिवाळी असेल .....


© प्रमोद जोशी